दिंद्रुड : गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीनचे पीक हातचे गेल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने अखेर पाच एकर क्षेत्रातील उभ्या सोयाबीन पिकावर रोटावेटर फिरवला. धारूर तालुक्यातील फकीर जवळा येथे शनिवारी ही घटना घडली.
फकीर जवळा येथील शेतकरी सुनील राजाभाऊ साबळे यांनी गट क्रमांक ३९ मधील पाच एकर क्षेत्रात सुमारे तीन महिन्यांपूर्वी सोयाबीनची पेरणी केली होती. पेरणी, औषध फवारणी, खुरपणी आदींसाठी हजारो रुपये खर्च करूनही पावसाने पाठ फिरवल्याने पिकाची वाढ खुंटली. अपुऱ्या पावसामुळे पिकाला फुलोराही आला नाही. त्यातच पावसाअभावी सोयाबीनची झाडे करपून गेल्याने संपूर्ण पीक वाया गेले.
उत्पादनाची कोणतीही शक्यता नसल्याने नाईलाजास्तव साबळे यांनी पाच एकर क्षेत्रातील उभ्या सोयाबीन पिकावर रोटावेटर फिरवून ते जमिनीत गाडले. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सुनील साबळे यांनी केली आहे.