बीड : एल निनोचा प्रभाव आणि जून महिना अर्धा उलटूनही पावसाने दिलेली दडी यामुळे बीड जिल्ह्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमधील पाणीसाठा झपाट्याने घटला असून, सध्या केवळ १६.११ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. परिणामी प्रशासनासह शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात एकूण 173 मध्यम व लघु प्रकल्प असून त्यामध्ये केवळ 17.25 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. यापैकी 81 प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले असून 79 प्रकल्प मृतसाठ्यात गेले आहेत. केवळ 13 प्रकल्पांमध्ये काही प्रमाणात पाणी शिल्लक असल्याचे चित्र आहे. पाण्याअभावी ग्रामीण भागातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. सध्या 12 गावे आणि 14 वाड्यांना 19 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून 109 गावांसाठी 221 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
रूटी आणि तलवार प्रकल्पांतील साठा अत्यंत चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. अनेक ठिकाणी तलावाच्या तळाशी खड्डे खोदून पाणी शोधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
जिल्ह्यात लवकर आणि दमदार पाऊस न झाल्यास येत्या काही आठवड्यांत पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेती, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याबरोबरच पाण्याचा प्रश्नही गंभीर स्वरूप धारण करण्याची चिन्हे आहेत.जून संपत आला तरी पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांच्या आकाशाकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. पाऊस न झाल्याने पेरण्यादेखील खोळंबल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांचा इशाराबीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले की, जिल्ह्यातील अनेक प्रकल्प मृतसाठ्यापर्यंत पोहोचले आहेत. या पार्श्वभूमीवर जलसंपदा, महावितरण आणि संबंधित विभागांच्या वारंवार बैठका घेण्यात आल्या आहेत. ज्या भागांतून बेकायदा पाणीउपसा होत असल्याची माहिती मिळेल, त्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले असून पाणीचोरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
प्रमुख प्रकल्पांतील उपलब्ध पाणीसाठा (टक्केवारीत)
माजलगाव- 21.22, बिंदुसरा- 19.81, सिंदफणा- 18.44, बेलपारा - 7.78, मेहकरी- 9.67, कडी- 22.15, रूटी- 0.31, तलवार- 0.61, वाण - 27.34, बोरणा- 15.39, बोधेगाव - 19.64, सरस्वती- 29.82, कुंडलिका- 33.51