केज :- विलास घुले खून प्रकरणातील दहा पैकी सहा आरोपींची आज पोलिस कोठडी संपल्या नंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने पुन्हा तीन दिवसांची पोलिस कोठडी वाढवून दिली आहे.
बीड जिल्ह्यातील टाकळी येथील विलास घुले हा हॉटेल मालक त्याचा मित्र उमेश माने यांचे भांडण सोडविण्यासाठी गेला असता त्याच्यावर चाकू हल्ला होऊन त्यात विलास घुले यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. मृत्यू नंतर सुरुवातीला विलास घुले यांचे फिर्यादी असलेले भाऊ रमेश घुले यांनी नऊ आरोपी विरुद्ध फिर्याद दाखल केली होती.
त्या नंतर फिर्यादी यांनी पुरवणी जबाब नोंदवून या प्रकरणी खा. बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांनी आरोपींना मदत केली असल्याचे म्हटले होते. त्यामुळे या प्रकरणाची राज्यात चर्चा सुरू होती. तसेच या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम प्रमुख असलेल्या एसआयटी मार्फत सुरू आहे.
विलास घुले खून प्रकरणात एकूण दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी रामेश्वर गायकवाड यांच्यासह मंगेश कदम, शुभम गायकवाड, नवनाथ कदम, दीपक कदम, अजय कदम या सहा जणांची दि. ३० जून रोजी पोलिस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि. २ जुलै पर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी वाढवून दिली आहे. त्यामुळे आता सर्व दहा आरोपींचा मुक्काम २ जुलै पर्यंत पोलिस कोठडीत आहे.