अंबाजोगाई : तालुक्यातील युवकांना कोणाची नजर लागली की काय असा यक्षप्रश्न भेडसावू लागला आहे. कारण युवकांत आत्महत्या, अत्याचार, गुंडगिरी , तसेच टवाळखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतांना दिसून येत आहे. नुकतीच दै पुढारीमधून बातमी देखील प्रकाशित करण्यात आली होती. अशीच तालुक्यात एक २४ वर्षीय तरुणाने नैराश्येतून विषप्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याचे उघडकीस आले आहे. मित्रांसोबत झालेल्या वादानंतर आणि वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला बोलावले नसल्याच्या कारणातून आलेल्या एकटेपणाच्या भावनेतून तरुणाने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे घडली असून महेश उद्धव भणगे असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महेशने मंगळवारी दुपारी आपल्या राहत्या घरात विषारी औषध प्राशन केले. घराच्या छतावर तो एकटाच झोपायला गेला होता. त्याने पाणी पिण्याच्या तांब्यात काहीतरी विषारी द्रव्य मिसळून प्यायले होते. बराच वेळ झाला तरी महेश खाली आला नाही हे लक्षात आल्यानंतर त्याला पाहण्यासाठी कुटुंबीय रात्री ८ वाजेच्या सुमारास छतावर गेले असता तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला त्याच अवस्थेत तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
महेशचे त्याच्या मित्रांसोबत काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. सोमवारी दि ६ एप्रिल रोजी एका मित्राचा वाढदिवस होता. नेहमी मित्रांच्या कामात आणि वाढदिवसाच्या नियोजनात पुढाकार घेणाऱ्या महेशला यावेळेस मित्रांनी बोलावले नाही. त्याला सोडून सर्वांनी वाढदिवस साजरा केला. यामुळे तो प्रचंड मानसिक तणाव दडपणाखाली होता. आत्महत्येपूर्वी मंगळवारी दुपारी त्याने आपल्या मोबाईलवर "माझं दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो" असे भावनिक स्टेटस ठेवले होते. या स्टेटसवरून त्याला आलेला एकटेपणा आणि नैराश्य दिसून येत आहे. ऐन उमेदीच्या वयात महेशने इतके टोकाचे पाऊल उचलल्याने कुंबेफळ गावात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान महेश च्या हट्टासाठी वडिलांनी शेती विकून त्याला अंबाजोगाई शहरात कपड्याचे दुकान टाकून दिले होते.