गेवराई : बीड जिल्ह्यात बोगस लग्न लावून देणाऱ्या टोळीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून ग्रामीण भागातील तरुणांना टार्गेट करून लाखो रुपयांची फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. यापूर्वीही अशा प्रकारे अनेक तरुणांची फसवणूक झाल्याचे समोर आले होते.
ताज्या घटनेत, गेवराई तालुक्यातील उमापूर येथील युवकाची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे, एका तरुणीचे याआधीच तब्बल आठ जणांशी लग्न लावण्यात आले होते. त्यानंतरही पैशाच्या लालसेपोटी एजंटमार्फत त्याच तरुणीचे नवव्या युवकासोबत पुन्हा लग्न लावून देण्यात आले.
या बनावट लग्नासाठी संबंधित युवकाकडून लाखो रुपये उकळण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित युवक योगेश शिंदे (रा. उमापूर) यांनी बीड जिल्ह्यातील चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत न्यायाची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे ग्रामीण भागात खळबळ उडाली असून अशा बोगस लग्न टोळ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.