Beed Salewadgaon-Ganeshwadi road bridge corruption
कडा: आष्टी तालुक्यातील सालेवडगाव ते गणेशवाडी रस्त्यावर नदीवर उभारण्यात येत असलेल्या ३५ लाखांचा नळकांडी पुलाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. ग्रामस्थांच्या जागृतीमुळे निकृष्ट दर्जाचे काम समोर आले असून संतप्त नागरिकांनी अधिकारी व गुत्तेदाराला घटनास्थळीच धारेवर धरत काम तात्काळ थांबवले. वाढता रोष पाहता प्रशासनाला जेसीबीच्या साह्याने निकृष्ट काम पाडून नव्याने गुणवत्तापूर्ण बांधकाम करण्याचे आश्वासन द्यावे लागले.
पावसाळ्यात नदीला पाणी आल्याने शाळकरी मुले व ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असल्याने जिल्हा नियोजन समितीकडून या पुलाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात सुरू असलेल्या कामाचा दर्जा अत्यंत सुमार असल्याचे पाहणीदरम्यान ग्रामस्थांच्या लक्षात आले. तब्बल ३५ लाखांच्या निधीत होणारे काम अवघ्या दोन ते तीन लाखांत उरकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
शासन निधीवर डल्ल्याचा आरोप...
अधिकारी व गुत्तेदाराच्या संगनमताने शासनाच्या निधीवर डल्ला मारण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करत सोमवारी सालेवडगाव येथील ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी थेट पुलावर जाऊन काम बंद पाडले.
अधिकाऱ्यांना घेराव, लेखी आश्वासनानंतर गावकरी शांत
आष्टी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची पाहणीवेळी ग्रामस्थांनी घेराव घालत जाब विचारला.निकृष्ट कामाबाबत प्रश्नांचा भडीमार झाल्यावर अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली.अखेर हे काम पाडून नव्याने दर्जेदार काम करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच वातावरण निवळले.यावेळी इंजिनिअर सुनील राठोड यांनी संबंधित गुत्तेदारावर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
कठोर कारवाईची मागणी
शासकीय निधीचा गैरवापर करणाऱ्या अधिकारी व गुत्तेदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सालेवडगाव व गणेशवाडी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे संभाव्य मोठा अपघात टळला असून,या प्रकरणाची जिल्हास्तरा वरून सखोल चौकशी व्हावी,अशी मागणी करण्यात येत आहे.