Ambhora Gram Panchayat
कडा : आष्टी तालुक्यातील अंभोरा ग्रामपंचायतीतील कथित अतिक्रमण आणि गैरव्यवहाराचे प्रकरण चर्चेत आले असून, विद्यमान सरपंचांवर विविध गंभीर आरोप करण्यात आले आहेत. गावठाण व गायरान जमिनीवर अतिक्रमण करून बांधकामे केल्याचा तसेच ग्रामसेवकाशी संगनमत करून नियमबाह्य कारभार केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर सरपंच चौकशीच्या फेऱ्यात आले असून, या प्रकरणाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
या संदर्भात चेअरमन रावसाहेब खाकाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य सुखदेव खाकाळ, संतोष खाकाळ, परमेश्वर खाकाळ आणि रामेश्वर काळे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी संबंधित पक्षांची बाजू ऐकून घेण्यात आली असून, पुढील सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, अंभोरा गावातील गावठाण आणि गायरान क्षेत्रात अतिक्रमण करून बांधकामे करण्यात आली आहेत. या प्रकरणाची प्रशासनाने सखोल चौकशी करून प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच खरेदी-विक्री झालेल्या जागांचे पीटीआर देण्यास ग्रामसेवकांकडून नकार दिल्याचा आरोपही तक्रारदारांनी केला आहे.
ग्रामपंचायतीच्या मालकीचे गाळे कोणतीही खुली लिलाव प्रक्रिया न राबवता काही निवडक व्यक्तींना भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचे वाटप करताना पारदर्शकता आणि नियमांचे पालन झाले का, याची चौकशी करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे.
अतिक्रमण, गाळे वाटप आणि ग्रामपंचायतीच्या कारभारातील कथित अनियमिततेबाबत करण्यात आलेल्या आरोपांची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, तसेच दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार व ग्रामस्थांकडून होत आहे.