अंबाजोगाई: अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याचा आज (दि.२) सकाळी बसच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला.
विजयमाला सरवदे (वय ५७) असं या महिलेचं नाव असून, कामावर जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. ज्या बसने त्या कामासाठी आल्या होत्या, त्याच बसच्या चाकाखाली चिरडून कर्मचारी महिलेचा दुर्दैवी अंत झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजयमाला सरवदे या केज येथील मूळ रहिवासी होत्या आणि गेल्या ३५ वर्षांपासून अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करत होत्या. आज सकाळी त्या धारूर-परळी (एमएच १५ एमएच २३४७) या बसमधून कामासाठी जात होत्या. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाईतील मोरेवाडी पाण्याच्या टाकीजवळ त्या बसमधून उतरत असताना त्यांचा पदर बसच्या दरवाज्यात अडकला.
पदर बसच्या चाकात अडकल्याने त्या खाली पडल्या आणि त्याचवेळी चालकाच्या लक्षात न आल्याने बस पुढे सरकली. बसचे चाक त्यांच्या पायावरून गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. तातडीने त्यांना उपचारासाठी स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेमुळे नातेवाईकांनी बस चालकाच्या बेजबाबदारपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी बस आणि चालकाला ताब्यात घेतलं असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. विजयमाला सरवदे यांच्या पश्चात दोन मुली आहेत. पतीच्या निधनानंतर त्यांनी नोकरी करून मुलींना चांगलं शिक्षण आणि संस्कार दिले होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दुपारी ४ वाजता केज येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.