गेवराई : विहिरीत पडलेली मोटारसायकल काढण्यासाठी, विहिरीत उतरलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उमापूर ता.गेवराई जि.बीड येथेशुक्रवार ता. 23 रोजी दु. तीन वाजण्याचे सुमारास घडली. दरम्यान, विहिरीत पाणी असल्याने दोन्ही तरूणांचा मृतदेह बाहेर काढण्यात अडचणी आल्या आहेत. विहिरीतील पाणी उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, उमापूर पोलीसांचे पथक घटनास्थळी ठाण मांडून आहेत. संदीप सोनवणे व दीपक मोरे अशी मृत्यूमूखी पडलेल्यांची नावे असून ही दोघे राहता ता. शिर्डी जि. अहिल्यानगर [ नगर ] येथील असल्याची चर्चा आहे.
गेवराई तालुक्यातील उमापूर जवळच्या मालेगाव रस्त्यावर हवाले यांच्या मालकीची विहिर आहे. या विहिरीत एक मोटारसायकल पडलेली आहे. सदरील मोटारसायकल काढण्याचे काम दोन तरूण करत होते. मात्र, विहिरीतल्या पाण्यात पेट्रोल पसरल्याने, तरूणांचा श्वास कोंडल्याने दोघेही पाण्यात बुडाल्याने, त्या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, अनेक लोक विहिरीच्या अवतीभवती होते. तरीही, त्यांना काहीच करता आले नाही. विहिरीची खोली अधिक असल्याने, तिथपर्यंत मदत करता आली नाही.
घटनेची माहीती मिळताच, चकलांबा, उमापूर येथील पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पंपाचा वापर करून, विहिरीतील पाणी काढले जात आहे. मोटारसायकल विहिरीत कशी पडली, कुणी टाकली, त्याची नेमकी कारणे पोलीस तपासात उघड होतील, अशी माहिती आहे.