बागपिंपळगाव : बागपिंपळगाव-टाकरवन मार्गे माजलगावकडे जाणारा राज्य महामार्ग सध्या बाजूच्या पंख्यावरील काटेरी गवत व झुडपांच्या विळख्यात सापडला असून, संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे अंतर दाखवणारे दगडही गवतामध्ये दडल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
बागपिंपळगाव-टाकरवन मार्गे सुरडीपर्यंत या राज्य महामार्गाचे दुरुस्तीचे काम सन 2021 मध्ये पूर्ण करण्यात आले होते. सुरुवातीच्या काळात महामार्गालगतच्या साईड पंख्यावरील काटेरी गवत व झाडे नियमितपणे काढली जात होती. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या कामाकडे संबंधित विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येत आहे.
दुरुस्ती झाल्यानंतर या महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र वळणाच्या ठिकाणी तसेच साईड पंख्यालगत उगवलेले काटेरी गवत व झुडपे दृष्टीआड अडथळा ठरत असून, त्यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची तक्रार वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पावसाळ्यात हा मार्ग अधिकच धोकादायक ठरत आहे.
या राज्य महामार्गावर दर एक किलोमीटर अंतरावर अंतर दर्शविणारे दगड उभारण्यात आले आहेत. मात्र सध्या हे दगड साईड पंख्यावरील गवताच्या विळख्यात अडकले असून, अनेक ठिकाणी ते दिसेनासे झाले आहेत.
परिणामी वाहनचालकांना पुढील गाव किती अंतरावर आहे, याचा अंदाज येत नसल्याने गैरसोय होत आहे. या गंभीर परिस्थितीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देऊन साईड पंख्यावरील काटेरी गवत काढणे, अंतर दर्शक दगड मोकळे करणे व महामार्ग सुरक्षित करण्याची मागणी वाहनचालक व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
ऊस वाहतुकीमुळे धोका अधिक
सध्या या राज्य महामार्गावर ऊस वाहतुकीची वाहने मोठ्या प्रमाणात धावू लागली आहेत. ट्रक व ट्रॅक्टरच्या वर्दळीमुळे ओव्हरटेक करताना इतर वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यातच साईड पंख्यावरील गवतामुळे बिघडलेली साईड जागा, खराब दृश्यता यामुळे वाहन साईडला घेताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.