शरद रेडेकर
आष्टी : गतवर्षी निसर्गाने आष्टी आणि पाटोदा तालुक्यावर अक्षरशः कृपावर्षाव केला. लघु आणि मध्यम प्रकल्प तुडुंब भरले, ओव्हरफ्लो झाले. तीन वर्षे पुरेल एवढा जलसाठा उपलब्ध असतानाही प्रशासनाच्या बेफिकिरीने आणि नियोजनशून्य कारभाराने आज आष्टी तालुक्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. त्यामुळे दुष्काळ निसर्गामुळे नव्हे, तर कारभारामुळे पडला, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकर्यांमधून व्यक्त होत आहे.
तालुक्यातील सात मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ 8.01 टक्के तर 33 लघु प्रकल्पांमध्ये अवघा 0.64 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तब्बल 29 प्रकल्प शून्यावर आले असून सहा मध्यम आणि तेवीस लघु प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. कडा, रुटी आणि तलवार प्रकल्पांची अवस्था दयनीय बनली आहे.
मुबलक पाणी उपलब्ध असताना ते पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले नाही. बेकायदेशीर उपसा, बेसुमार वापर आणि महसूल व जलसंपदा विभागाच्या सुस्त कारभारामुळे लाखो घनमीटर पाणी वार्यावर गेले. प्रशासनाने वेळेत कठोर पावले उचलली असती तर आज टँकरची वेळ आली नसती, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
पंचायत समितीकडून 11 गावांसाठी प्रस्ताव आले, मात्र आतापर्यंत फक्त पाच टँकर मंजूर झाले आहेत. उर्वरित गावांतील नागरिकांना अजूनही पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. विहिरी आणि कूपनलिकांनी तळ गाठला असून परिस्थिती आणखी गंभीर झाल्यास स्थलांतराची वेळ येण्याची भीती व्यक्त होत आहे.
जबाबदार कोण?
गतवर्षी निसर्गाने विक्रमी पाऊस दिला, प्रकल्प भरले, मात्र त्याचे योग्य नियोजन करण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरले. त्यामुळे आता निर्माण झालेल्या टंचाईला निसर्गाला दोष देण्यापेक्षा संबंधित विभागांच्या निष्क्रियतेचा आणि ढिसाळ नियोजनाचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. निसर्गाने कृपा केली, पण प्रशासनानेच आष्टी तालुक्याला तहानले ठेवले; हा दुष्काळ पावसाचा नसून नियोजनशून्य कारभाराचा आहे अशा प्रतिक्रिया जनसामान्यांमधून उमटत आहेत.