सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण File Photo
बीड

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अंबादास दानवे, आ. सुरेश धस, यांच्यासह अनेकांच्या भेटी

Beed Crime News | पोलिसांनाही सहआरोपी करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

केज : केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्ये प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आ. सुरेश धस, बाबुराव पोटभरे, ज्योतीताई मेटे, शैलेश कांबळे यांनी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून या प्रकरणी गुन्हेगार यांना कठोर शासन व्हावे आणि जे कोणी पोलीस अधिकारी यात दोषी असतील किंवा गुन्हेगारांशी सबंधित पोलीस अधिकाऱ्यांनाही सहआरोपी करण्यात यावे अशी मागणी केली

तर जनतेलाच उठाव करावा लागेल , अंबादास दानवे (विधान परिषद विरोधी पक्ष नेते)

हे प्रशासन कोणाच्यातरी हाताचं पाऊल बनलेला आहे. या घटनेला संतोष देशमुख यांचा जो झालेला खून आहे. तो जर पोलिसांनी ठरवला असता तर तो त्यांना रोखता आला असता. मात्र आरोपी आणि पोलीसच एकमेकात मिळालेले आहेत. प्रशासनाला काही समजतच नाही. संतोष देशमुख यांच्या अपहरणाची तीन तास उलटले तरी पोलिसांनी तक्रार घेतलेली नाही. या हत्येचा तपास अजूनही गतीने झालेला नाही. अतिशय तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने तपास झालेल्या दिसत नाही. अजूनही सर्व आरोप अटक केलेले नाहीत. पोलीस आणि प्रशासन जर कारवाई करीत नसेल तर लोक उठाव करतील.

ॲड. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करा : आ सुरेश धस

संतोष देशमुख यांची महाभयंकर अतिशय निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आलेली आहे. अतिशय किरकोळ कारणासाठी एवढ्या क्षुल्लक कारण्यासाठी एखाद्या व्यक्तीचा जीव घेतला जातो. हे मला वाटतं बीड जिल्ह्याच्या इतिहासातील पहिली घटना आहे. जर पोलिसांचा त्यात सहभाग असेल तर त्यांनाही आरोपी करायला हवे. सीआयडी चौकशीचे मागणी केली वेगवेगळी परंतु इतर सीआयडी चौकशीची गरजच नाही. आमचं सर्वांचं मत असं झालंय की अप्पर एस पी पांडकर यांच्या अध्यक्षतेखाली एस आय टी मार्फत या घटनेचा तपास व्हावा. तसेच ॲड. उज्जल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.

पोलिसांनाही सहआरोपी करा : बाबुराव पोटभरे

जिल्ह्यामध्ये एकूणच कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याचे या प्रकरणावरून दिसते. यामध्ये ज्या पद्धतीने आरोपी दोषी आहेत अगदी त्याच पद्धतीने आरोपी बरोबरच पोलीस सुद्धा दोषी आहेत. पोलिसांनी जर तात्काळ याच्यावर कारवाई केली असती आणि पोलिसांनी जर ॲक्शन घ्यायला सुरुवात केली असती तर वाटते हा अमानुष प्रकार घडला नसता.

मास्टर माईंड कोण याचा तपास व्हायला हवाः ज्योतीताई मेटे

अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत या करता प्रशासनाने कायम सजग राहून कार्यवाही करण्या बाबत सक्त सूचना दिल्या जाणं अतिशय गरजेचं आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांना नम्र आवाहन आहे हे प्रकरण मर्यादित न राहता या प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण आहे हे शोधणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT