टोल नाक्यावरील अपघात प्रकरणी एचपीएम कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल fiel photo
बीड

Beed News | केज टोल नाक्यावरील अपघात प्रकरणी HPM कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल

रस्ता बांधकाम कंपन्या आता तरी ताळ्यावर येणार का?

पुढारी वृत्तसेवा

गौतम बचुटे : केज टोल नाक्यावर टाकलेला मातीचा ढिगारा आणि रस्ता उखडून टाकलेले सिमेंट काँक्रीटचे तुकडे व त्याचे अवशेष टाकल्याने रस्ता धोकादायक झाला आहे. रस्ते सुरक्षेसाठी कोणतीही उपाय योजना न केल्यामुळे झालेल्या अपघातात अवघ्या दोन महिन्याच्या चिमुकलीचा हात धडापासून तुटून पडला. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात एचपीएम कंपनीचे मालक आणि मॅनेजर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील गुरुनाथ दत्ताराम जाधव हे लातूर येथून त्यांच्या भावाची पत्नी प्रणिता नवनाथ जाधव, तिची दोन महिने वयाची लहान मुलगी, दुसरी पाच वर्ष वयाची मुलगी शावडी नवनाथ जाधव, भावाची सासू कलावती जुने हे ह्युंदाई व्हेन्यू क्र. (एम एच-२०/जी क्यू-२९४९) ने १८ ऑक्टोबर रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास संभाजीनगरकडे जात होते. केज-मांजसुंबा रोडवरील उमरी फाट्याजवळ असलेल्या टोल नाक्यावर आले असता त्यांची कार रस्त्यावर टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्याला धडकली. त्यानंतर रस्ता सिमेंट काँक्रिटच्या अवशेषांच्या ढिगाऱ्याला धडकून दोन ते तीन वेळा पलटी झाली. अपघातात कारचा चुराडा झाला. यामध्ये अवघ्या दोन महिन्याच्या चिमुरडीचा हात धडापासून वेगळा होवून तुटून पडला. तसेच त्या चिमुरडीची आई, बहीण, आजी, चुलता आणि कारचा चालक हे गंभीर जखमी झाले. तुटलेल्या तुकड्यांचा ढिगारा टाकुन ढिगाऱ्यावर तसेच आसपास कुठल्याही प्रकारचे सुचना फलक किंवा रात्रीच्या वेळी वाहन चालकास स्पष्ट दिसेल असे लाईटचे रिफ्लेक्टर, साईन-ग्लो बोर्ड न लावल्यामुळे गंभीर अपघात होवु शकतो. हे माहीत असताना सुद्धा एचपीएम कंपनीचे मालक व मॅनेजर यांनी निष्काळजीपणाचे कृत्य केले. त्यामुळे हा अपघात घडला. याप्रकरणी माधव दत्ताराम जाधव यांच्या तक्रारीवरून एचपीएम कंपनीचे मालक आणि मॅनेजर विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एचपीएम आणि मेगा कंपनीच्या गलथानपणामुळे अनेकांनी गमावले जीव !

केज तालुक्यातून खामगाव-सांगोला महामार्ग क्र. ५४८-सी आणि अहमदपूर-जामखेड महामार्ग क्र. ५४८-डी हे दोन महामार्ग जात आहेत. या दोन्ही महामार्गवर या कंपन्यांनी काम सुरू असताना सुरक्षेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची दखल न घेता मनमानी केलेली असून त्यांच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडून अनेकांचे जीव गेलेले आहेत. त्यामुळे आता गुन्हा दाखल झाल्यानंतर तरी संबंधितांना जाग येणार का? असा सवाल केला जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT