195 buses from Beed for the darshan of Vitthal
बीड, पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशी यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या वारकरी व भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बीड विभागाने १९५ विशेष बसगाड्यांचे नियोजन केले आहे. या बस २० ते ३० जुलै या कालावधीत धावणार असून, एकादशी २५ जुलैवानि आणि पौर्णिमा २९ जुलै रोजी असल्याने त्या अनुषंगाने वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यभरातही एसटीकडून आषाढी यात्रेसाठी विशेष बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी आगाऊ आरक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. भाविकांच्या मागणीनुसार अतिरिक्त बसगाड्याही उपलब्ध करून दिल्या जाणार असून, यासाठी संबंधित आगारप्रमुख किंवा स्थानकप्रमुखांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच, ४५ किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांचा समूह एखाद्या गावातून पंढरपूरला जाणार असल्यास त्या गावातून थेट विशेष बसची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रवाशांनी विनातिकीट प्रवास टाळून एसटी बसनेच सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन महामंडळाने केले आहे.
गतवर्षी ६८ हजार वारकऱ्यांनी केला प्रवास
मागील वर्षी बीड विभागाने आषाढी यात्रेदरम्यान १४३ विशेष बस चालवून सुमारे ६८ हजार भाविकांची वाहतूक केली होती. यंदा वाढत्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर १९५ बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना ५० टक्के सवलत, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू असलेल्या सवलतींचा लाभही या विशेष बससेवेत मिळणार आहे.