हतनूर; पुढारी वृत्तसेवा : कन्नड तालुक्यातील हतनूर परिसरातील सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकावर पाळीव जनावरे चरण्यासाठी सोडले जातात. यामुळे अपघातास निमंत्रण दिले जात असून महामार्ग सुरक्षा पोलिसांनी याबाबत दखल घेऊन दुभाजकावर जनावरे चारण्यासाठी बंदी घालण्यात यावी अशी मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे.
सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर सध्या हिरवेगार गवत आहे त्यामुळे शेतकरी या दुभाजकावर म्हैस,गाय,बैल आणि वासरे ही जनावरे चरण्यासाठी सोडले जात आहेत. रस्त्यावर ही जनावरे ये जा करतात अचानकपणे एकमेकांशी टक्कर खेळतात या रस्त्यावर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांची धडक बसून अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महामार्गावरील सुरक्षा व्यवस्था जपण्यासाठी महामार्ग सुरक्षा पोलिसांचे स्वतंत्र खाते असून त्याची चौकी कन्नड तालुक्यातील सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील आलापूर फाट्यावर आहे.तथापि त्या चौकीपासून हाकेच्या अंतरावर दुभाजकावर गुरे चरत असतात मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे अपघातास निमंत्रण दिले जाणारे या जनावरे चरण्यासाठी सोडण्या-यावर कारवाई केली जावी अशी मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे