ख्यातनाम साहित्यिक, विचारवंत, प्राध्यापक रंगनाथ पाठारे, स्व. हरी नरके यांसारख्या मान्यवरांनी प्रचंड खस्ता खात मराठी भाषेचे प्राचीनत्व सिद्ध केल्याने केंद्राला अखेर मायबोली मराठीचा अभिजात (Marathi Abhijat Bhasha) दर्जा मान्य करावा लागला.
भारतीय राज्यघटनेत अभिजात भाषांच्या यादीत मराठीचाही समावेश झाल्याने या भाषांची संख्या आता ११ वर पोहोचली आहे. आतापर्यंत तमिळ, संस्कृत, मल्याळम, तेलगू, कन्नड आणि ओडिया या सहा भाषांना हा दर्जा मिळाला होता.
त्यात आता मराठी, बंगाली, पाली, प्राकृत व आसामी भाषेचा समावेश झाला आहे. त्यामुळे अभिजात दर्जा असलेल्या भाषांची संख्या आता अकरा झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, ही मागणी महाराष्ट्रातील तमाम जनता करत होती. साहित्यिक, अभ्यासक यांच्यासह राजकीय नेत्यांनीही ही मागणी लावून धरली होती.
संबंधित भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान १५००-२००० वर्षे प्राचीन असावा.
या भाषेतील प्राचीन साहित्य हे महत्त्वाचे, मौल्यवान असावे.
भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे, ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी.
प्राचीन भाषेचे स्वरूप हे सध्याच्या भाषेपासून वेगळे असावे.
मोदी सरकारच्या निर्णयानुसार, मराठीसह आणखी पाच भाषांना अभिजात दर्जा देण्याचा परिणाम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही संभवतो.
मात्र, खासकरून महाराष्ट्र (मराठी), बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश (पाली आणि प्राकृत), पश्चिम बंगाल (बंगाली) आणि आसाम (आसामीज) ही या अभिजात निर्णयाची प्रभावक्षेत्रे होत.
अभिजात भाषेतील अभ्यासकांना दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.
अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येते.
प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केले जाते.
माय मराठीच्या इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय आहे. या महत्त्वाच्या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रातील समस्त जनतेच्या वतीने मनःपूर्वक आभार व महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन. -नितीन गडकरी, केंद्रीय महामार्ग मंत्री