Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest Pudhari
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: ‘आता घरात बसू नका, अंतरवालीत धडक द्या’; जरांगेंचा एल्गार, सरकारला थेट इशारा, 'गरज पडली तर...'

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला घराबाहेर पडून मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीत येण्याचे आवाहन केले आहे.

Rahul Shelke

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारला दिलेल्या अल्टिमेटमची मुदत आज संपत असून, उद्यापासून अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नव्या आणि निर्णायक आंदोलनाला सुरुवात होणार आहे. सरकारकडून आंदोलन रोखण्यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू असल्या तरी आपल्या प्रमुख मागण्यांवर ठाम असलेल्या जरांगे पाटलांनी आंदोलनाचा निर्धार केला आहे.

सरकारच्या शिष्टमंडळाने यापूर्वी जरांगे पाटील यांची भेट घेऊन उपोषणाचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, मोठ्या प्रमाणावर सापडलेल्या कुणबी नोंदींच्या आधारे पात्र नागरिकांना प्रमाणपत्र देण्यासह इतर मागण्यांची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. विशेषतः 58 लाख नोंदींच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला थेट हाक दिली आहे. घरात न बसता मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीत पोहोचा, असे आवाहन त्यांनी केले. नोंदी उपलब्ध असूनही अनेकांना अद्याप अर्ज किंवा आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत अडचणी येत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

वंशावळ सापडल्यानंतरही महसूल पुराव्यासारख्या अतिरिक्त कागदपत्रांची अट घातली जात असल्याबद्दलही त्यांनी संताप व्यक्त केला. शेतजमीन किंवा विशिष्ट प्रकारचा पुरावा नसल्यास संबंधित व्यक्ती मराठा असल्याचे कसे नाकारले जाऊ शकते, असा सवाल त्यांनी केला. मृत पूर्वजांशी संबंधित पुरावे आणि इतर कागदपत्रांबाबत प्रशासनाकडून अनावश्यक अटी घातल्या जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नावर अधिक संवेदनशीलतेने निर्णय घ्यावा, असे सांगत जरांगे पाटील यांनी समाजातील तरुण आणि मुलींच्या भविष्याचाही मुद्दा उपस्थित केला. रोजगाराच्या संधी कमी असताना आणि आरक्षणाचा प्रश्न अद्याप प्रलंबित असताना मराठा कुटुंबांवर अन्याय होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी काही मंत्र्यांवरही अप्रत्यक्षपणे टीका केली. काही नेते इतरांच्या भूमिकेनुसार बोलत असल्याचा आरोप करत स्वतंत्रपणे मराठा समाजाच्या प्रश्नाकडे पाहण्याचे आवाहन त्यांनी केले. राज्यातील सत्ताधारी नेत्यांनी विविध योजनांचे श्रेय घेण्यापेक्षा तरुणांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न सोडवावेत, असा टोला त्यांनी लगावला.

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याचे संकेत देतानाच गरज पडल्यास आपण मुंबईत वर्षा बंगल्यावर जाऊन बसू, असा इशाराही दिला आहे. त्यामुळे सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात आज कोणती चर्चा होते का, सरकारकडून नवीन प्रस्ताव येतो का आणि उद्याच्या आंदोलनापूर्वी काही तोडगा निघतो का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

उद्यापासून सुरू होणाऱ्या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी अंतरवाली सराटीकडे यावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आता कोणते वळण मिळते आणि सरकार या वाढत्या दबावाला कसा प्रतिसाद देते, हे पुढील काही तासांत स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT