गोदावरी नदीकाठच्या नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना
नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून आज सकाळी ९ वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात १२ हजार ६२० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच नदीपात्रातील साहित्य व जनावरे तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.
आज सकाळी बंधाऱ्यातून ६ हजार ३१० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता. पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन सकाळी ९ वाजता त्यात वाढ करून विसर्ग १२ हजार ६२० क्युसेक्स करण्यात आला आहे.
पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास विसर्गात टप्प्याटप्प्याने आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने गोदावरी नदीपात्रालगतच्या परिसरातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, नदीपात्रात कोणतेही साहित्य अथवा जनावरे असल्यास ती तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत. तसेच पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्हातील तालुका मुख्यालयाची पर्जन्यमानची आकडेवारी (MM)
1) कागल=7
2)गारगोटी=51.3
3) हातकणंगले-18
4) गडहिंग्लज -6
5) राधानगरी-124
6) आजरा=98
7) शिरोळ=4
8) शाहूवाडी-56
9) पन्हाळा=48
10) गगनबावडा-48
11) चंदगड=68
खेड तालुक्यातून भीमाशंकरकडे जाणाऱ्या कावडे–कारकुडी मार्गावरील रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना या मार्गाने प्रवास करू नये, असा इशारा दिला असून सुरक्षित पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागाने विदर्भात पुढील आठवडाभर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पंचगंगा नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे पुलावर पाणी आले असून इचलकरंजीकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे माळीण फाट्याजवळ दरड कोसळून दोन घरांना धोका निर्माण झाला आहे. आहुपेकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
चिंचोली पुलावरून पाणी वाहू लागल्याने प्रशासनाने जुन्नर–घोडेगाव मार्ग तात्पुरता बंद केला आहे.
आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात घोड नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठच्या काही गावांमध्ये पाणी शिरले असून नुकसान झाले आहे.
दादर, वरळी, महालक्ष्मी आणि मलबार हिल परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला असून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातून 11,195 क्युसेक वेगाने तापी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील विसापूर-पांगारी मार्ग सततच्या पावसामुळे साडेतीन ते चार फूट खचला आहे. गावाचा संपर्क तुटल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
सावित्री, अंबा आणि कुंडलिका नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत असून महाड, नागोठणे आणि रोहा शहरांमध्ये पुन्हा पुराचे पाणी शिरले आहे.
कळवण तालुक्यात मुसळधार पावसामुळे चणकापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वडाळा-आमदर मार्गावरील रस्ता खचल्याने वाहतूक प्रभावित झाली आहे.
सातपूर, पाथर्डी फाटा, रामचंद्र नगर आणि दिंडोरी रोड परिसरातील घरांमध्ये व पार्किंगमध्ये पाणी शिरले आहे. नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.
सलग पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या कंबरेपर्यंत पुराचे पाणी पोहोचले असून अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.
नाशिक शहरात अवघ्या 12 तासांत 120 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अनेक भागांत पाणी साचले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कायम असून लोणावळ्यात गेल्या 48 तासांत 1,290 मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांतच 620 मिमी पाऊस झाला.
खडकवासला धरण 100% भरल्याने मुठा नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पुण्यातील एकता नगर परिसरात पाणी शिरले असून पुणे महापालिका अलर्ट मोडवर आहे.
महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे मुंबई, पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून अनेक रस्ते, पूल आणि घाटमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.