कोल्हापूर : अनिल देशमुख
सिंगल यूज प्लास्टिक (एकदा
वापरलेले प्लास्टिक) निर्मूलनासाठी जिल्हास्तरावर 'टास्क फोर्स'ची स्थापना करण्यात येणार आहे. जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली हा 'टास्क फोर्स' कार्यरत असेल. राज्य शासनाने प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एकदा वापरलेल्या प्लास्टिक निर्मूलनासाठी हा टास्क फोर्स असेल. जिल्ह्याचा कृती आराखडा तयार करून त्यानुसार प्लास्टिक निर्मूलन केले जाणार आहे. राज्यात प्लास्टिकचा वापर वाढतच आहे. त्यामुळे घनकचर्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. घनकचर्यात प्लास्टिकचा वाटा सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. महापालिका, नगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांकडून प्लास्टिकबंदीबाबत होणारी कारवाई अत्यंत तोकडी आहे.
जिल्हाधिकारी अध्यक्ष असणार्या या टास्क फोर्समध्ये महापालिका आयुक्त, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व गटविकास अधिकारी, एमआयडीसी, शिक्षण, पर्यटन आणि माहिती विभागाचे अधिकारी सदस्य आहेत. पर्यावरण विभागाचे प्रादेशिक अधिकारी सदस्य समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.
प्लास्टिक एकत्र करणे, त्यावर प्रक्रिया करणे, त्याचे निर्मूलन करणे, याबाबत धोरण ठरवून त्याची अंमलबजावणी केली जाणार. दुकानदार, विक्रेते यांची वारंवार बैठक घेऊन प्लास्टिक विक्री आणि वापर कमी करून पर्यायी वापर वाढवला जाणार. एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी, विविध क्लब, संस्था, संघटना आदींद्वारे याविरोधात जनचळवळ उभी केली जाणार.
हा टास्क फोर्स प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट 2021 च्या नियमानुसार प्रत्येक जिल्ह्याचा कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणार आहे. राज्य शासनाने प्लास्टिक आणि थर्माकोलबाबत मार्च 2018 मध्ये काढलेली अधिसूचना तसेच केंद्र शासनाने ऑगस्ट 2021 मध्ये सिंगल यूज प्लास्टिकबाबत काढलेल्या अधिसूचनेनुसार संबंधित सर्व यंत्रणांवर नियंत्रण ठेवले जाणार आहे.