कौलव/राशिवडे ; पुढारी वृत्तसेवा : चालू गळीत हंगामाची अंतिम टप्प्यातील लगबग जूनच्या दुसर्या आठवड्यापर्यंत सुरूच होती. यंदा उसाच्या विक्रमी उत्पादनामुळे साखरेचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात झाले. साखर उत्पादनात ब्राझीलनंतर महाराष्ट्र देशात पहिल्या, तर जागतिकस्तरावर दुसर्या क्रमांकावर आहे.
यंदा राज्यात 132 कोटी टन उसाचे गाळप होऊन 137 लाख टन विक्रमी साखर उत्पादन झाले आहे. गत हंगामापेक्षा 307 लाख टन जादा ऊस गाळप झाले. गाळपात सोलापूर, तर सरासरी उतार्यात कोल्हापूर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. दूधगंगा-वेदगंगा कारखान्याने राज्यात प्रथम क्रमांकाचा साखर उतारा राखला आहे.
101 सहकारी व 99 खासगी अशा 200 कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला. राज्याची दैनंदिन गाळप क्षमता प्रतिदिन 80 लाख टनांपर्यंत पोहोचली आहे. यावर्षी राज्याचा गळीत हंगाम सरासरी 173 दिवस चालला. गतवर्षी हाच हंगाम 140 दिवस चालला होता. राज्यात 1,320 लाख टन उसाचे गाळप होऊन 137 लाख टन साखर उत्पादित झाली आहे. सरासरी साखर उतारा 10.40 टक्के एवढा आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा 307 लाख टन जादा गाळप झाले आहे. तर साखर उत्पादन 31 लाख टनांनी वाढले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 33 कारखान्यांनी 229 लाख टन ऊस गाळपासह आघाडी घेतली आहे.त्यापाठोपाठ अहमदनगर(185 लाख टन)व कोल्हापूर(160 लाख टन) यांचा क्रम आहे. विभागीय पातळीवरही सोलापूर विभागाने 300 लाख टन एवढे उच्चांकी गाळप केले आहे. सर्वात कमी गाळप नागपूर विभागाने केले आहे.
सरासरी साखर उतार्यात कोल्हापुरातील दूधगंगा-वेदगंगा (12.99 टक्के) राज्यात भारी ठरला आहे. पंचगंगा-रेणुका शुगर्स (12.90 टक्के) राज्यात दुसर्या क्रमांकावर आहे.ऊस गाळपात सोलापुरातील बबनराव शिंदे कारखान्याने 24 लाख 78 हजार टन एवढे राज्यात पहिल्या क्रमांकाचे व गुरू कमॉडिटीने 18 लाख 98 हजार टनांचे गाळप केले आहे. सातार्यातील किसनवीर कारखान्याने 18,219 टन एवढे राज्यात नीचांकी गाळप केले आहे.