कोल्हापूर

बेळगावच्या सख्ख्या भावांचा तिलारी धरणात बुडून मृत्यू

दिनेश चोरगे

चंदगड; पुढारी वृत्तसेवा :  कुटुंबासह फिरायला आलेल्या रेहान अल्ताफ खान (वय 15) व मुस्तफा अल्ताफ खान (12, रा. कॅम्प एरिया, बेळगाव) या सख्ख्या भावांचा हजगोळी (ता. चंदगड) महादेव मंदिर नजीकच्या तिलारी बॅक वॉटर जलाशयात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. पाऊस आणि अंधार असल्याने दोघांनाही पाण्याबाहेर काढता आले नाही.

बेळगाव येथील अल्ताप खान हे पत्नी व 5 मुलांसह सहलीचा आनंद लुटण्यासाठी आले होते. दुपारचे जेवण आटोपल्यावर सर्वांनाच पाण्यात भिजण्याचा मोह आवरला नाही. काठावर पाण्यात खेळताना अंदाज न आल्याने मुस्तफा व रेहान खोल पाण्यात बुडाले. आई-वडिलांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. आरडाओरडा केला, पण मदतीसाठी जवळ कोणीही नसल्याने मदत मिळू शकली नाही. तत्काळ चंदगड पोलिसांनी पाणबुड्याच्या साहाय्याने मृतदेहांचा शोध घेतला, मात्र पाऊस आणि अंधार झाल्याने शोधमोहीम थांबवली. रविवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करणार असल्याचे पो. नि. संतोष घोळवे यांनी सांगितले. घटनास्थळी खान कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

SCROLL FOR NEXT