कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून 9 कोटी 40 लाखांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत हा निधी मिळाला आहे. या निधीतून समाधीस्थळाच्या ठिकाणी दुसर्या टप्यातील सुशोभीकरण व इतर कामे करण्यात येणार आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मागील सरकारच्या सर्व निर्णयांना स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे हा निधी थांबला होता. परिणामी कामेही ठप्प झाली होती.
राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या हयातीत आपली समाधी सिद्धार्थनगर, नर्सरी बाग येथे करावी, असे म्हटल्याची नोंद आहे. महाराजांची इच्छा आणि शाहूप्रेमी जनतेच्या मागणीचा विचार करून महापालिकेने राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक स्थळ नर्सरी बागेत उभारले आहे. याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. महापालिकेने स्वनिधीतून सर्व कामे केली आहेत. दुसर्या टप्प्यासाठी महापालिकेने 10 कोटींचा प्रस्ताव तयार करून शासनाला सादर केला होता. आता दुसर्या टप्प्यातील कामांसाठी आवश्यक निधीस मान्यता मिळाल्यामुळे या टप्प्यात होणारे काम अत्यंत जलदगतीने पूर्ण होणार आहे.