कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
शंभर वर्षांनंतरही राजर्षी शाहूंचा विधवा सन्मानाचा पुरोगामी विचार आज खर्या अर्थाने अंमलात येतोय, हाच खरा लोकराजा शाहूंच्या जयंतीचा उत्सव म्हणावा लागेल. वैधत्व येण्यामागे महिलेचा दोष नसतो, तरीही तिला कोणत्याही उत्सवाच्या कार्यक्रमात डावलले जाते. पतीच्या निधनानंतर कुटुंबाचा आधार बनून मुलांना घडवणारी ती महिला विधवा नाही तर पुर्णांगी आहे. सौभाग्यवती सबला आहे, असे प्रतिपादन प्राचार्य रेखा निर्मळे यांनी केले.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित शाहू विचारांचा जागर प्रबोधन कार्यक्रमात मंगळवारी विधवांच्या हळदी-कुंकू समारंभात त्या प्रमुख व्याख्यात्या म्हणून बोलत होत्या. विधवांची खणा-नारळासह सौभाग्य लेणे लेवून ओटी भरण्यात आली. याप्रसंगी अनेक महिलांच्या डोळ्यांच्या कडा पतीच्या आठवणींनी ओल्या झालेल्या पाहायला मिळाल्या.
सौभाग्य लेण्यांमुळे आजच्या समाजात वावरताना अनेक दुष्ट नजरा आणि विकृतीपासून संरक्षण मिळते. राजर्षी शाहू महाराजांनी जनतेचे राज्य केले. विधवा पुनर्विवाह, विधवा बंदी कायदा, आंतरजातीय विवाह संरक्षण असे शासन कायदे करून महिलांना सन्मान दिला. मात्र, परंपरागत जोपासलेल्या रुढींना मूठमाती देत काळानुरूप या महिलांचे अस्तित्व स्वीकारून त्यांनाही आनंदाने जगण्याचा अधिकार द्यावा, अशी मागणीही रेखा निर्मळे यांनी केली. यावेळी सुनीता पाटील, सरलाताई पाटील, मालन पोवार, सुधा सरनाईक, पुजा शिराळकर, सरिता हारुगले, धनश्री तोडकर, छाया जाधव, सुवर्णा मिठारी, मीनाक्षी डोंगरसाने आदींची उपस्थिती होती.
आज आंतरजातीय विवाह
बुधवारी (दि. 22) दुपारी बारा वाजता भवानी मंडप या ठिकाणी राजर्षी शाहू महाराज यांच्या सत्यशोधक विचारांच्या पद्धतीने एक आंतरजातीय विवाह समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.