कोल्हापूर; विकास कांबळे : जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा सध्या धुरळा उडाला आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या राजाराम व बिद्री सहकारी साखर कारखान्याबरोबरच कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. गेल्या निवडणुकीत आ. हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील व आ. विनय कोरे एकत्र होते. त्यांच्या विरोधात आ. पी. एन. पाटील व महादेवराव महाडिक तसेच शिवसेनेची आघाडी होती.
गेल्या सात वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यामुळे आ. पाटील, महाडिक यांच्या साथीला आ. विनय कोरे येण्याची शक्यता आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र असल्यामुळे गेल्यावेळी विरोधात लढलेली शिवसेना यावेळी सतेज पाटील, आ. हसन मश्रीफ यांच्या सोबतच राहील, अशी शक्यता आहे. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत 'काँटे की टक्कर' पाहावयास मिळणार आहे.
जिल्ह्यात अजूनही काँग्रेस व राष्ट्रवादी काँगे्रसच्याच नेत्यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे बहुतांशी सहकारी संस्थांमध्ये त्यांचीच सत्ता असते. गेल्या दहा वर्षांत मात्र भाजपने आपली ताकद ग्रामीण भागात देखील वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तेसुद्धा सहकारी संस्थांमध्ये प्रवेश करू लागल्याचे दिसत आहेत. बाजार समितीमध्ये आ. सतेज पाटील, आ. हसन मुश्रीफ, आ. विनय कोरे, शेतकरी कामगार पक्षाचे माजी आ. संपतराव पवार-पाटील यांची सत्ता होती. त्यांच्या विरोधात आ. पी. एन. पाटील व माजी आ. महादेवराव महाडिक यांचे पॅनेल होते. या शिवाय शिवसेनेने प्रथमच बाजार समितीच्या निवडणुकीत आपले स्वतंत्र पॅनेल उभे केले होते. त्यांचे दोन उमेदवार निवडूनही आले होते. भाजपने केवळ एक जाग जिंकली होती.
गेल्या सात वर्षांत राजकारणाची समीकरणे बदलली आहेत. आ. विनय कोरे सध्या भाजपसोबत आहेत. त्यांच्या मतदारसंघातील मतदारांची संख्या अधिक आहे. यासंदर्भात ते राज्याच्या राजकारणात आपण भाजपसोबत असल्याचे जाहीरपणे सांगतात. जिल्ह्याच्या राजकारणात ते सोयीप्रमाणे भूमिका घेताना दिसत आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या यावर्षीच्या निवडणुकीकडे ते कोणासोबत राहणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेनेमध्ये फूट पडली असल्यामुळे यावेळी शिवसेना कोणती भूमिका घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आ. पी. एन. पाटील व माजी आ. महादेवराव महाडिक गेल्या निवडणुकीत एकत्र होते. यावर्षीच्या निवडणुकीतही ते एकत्र राहण्याची शक्यता आहे.
बाजार समितीचे कार्यक्षेत्र साडेसहा तालुक्यात आहे. त्यामध्ये सर्वाधिक मतदार करवीर तालुक्यातील आहेत. त्यापाठोपाठ पन्हाळा व शाहूवाडी तालुक्याचा क्रमांक लागतो. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात कागल तालुक्याचा निम्मा भाग येतो. अर्धा तालुका येत असला तरी बाजार समितीमधील कारभारी याच तालुक्यातील असतात. यावेळी समरजितसिंह घाटगे देखील भाजपच्या बाजूने उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोण कोणासोबत जाणार यावरच लढतीचे चित्र अवलंबून आहे.