कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक 15 मार्चपर्यंत लांबणीवर टाकण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिले. या निर्णयामुळे कोल्हापूर बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील 230 ग्रामपंचायतींमधील सुमारे 2 हजारांपेक्षा जास्त नवनिर्वाचित सदस्यांना बाजार समितीच्या मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. कोल्हापूर बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होती. दि. 29 जानेवारी रोजी बाजार समितीसाठी मतदान होणार होते. दरम्यान, जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यातील कोल्हापूर बाजार समितीच्या साडेसहा तालुक्यांतील 230 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.
ग्रामपंचायतींचे सदस्य हे बाजार समितीचे मतदार असतात, त्यांना बाजार समितीची निवडणूक लढवता येते. ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी बाजार समितीच्या निवडणुका घेण्यात आल्या, नवनिर्वाचित सदस्यांना बाजार समितीची निवडणूक लढविण्याच्या हक्कापासून वंचित राहावे लागेल. तेव्हा कोल्हापूर बाजार समितीची निवडणूक पुढे ढकलावी, अशी याचिका नाथाजी पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. यामध्ये कोल्हापूर बाजार समितीची निवडणूक 15 मार्चनंतर घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे बाजार समितीची निवडणूक साडेतीन महिने लांबणीवर पडली आहे.