कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : अग्निवीर सैन्य भरती मंगळवारपासून (दि. 22) सुरू होणार असल्याने या भरतीसाठी मोठ्या संख्येने तरुण शहरात दाखल झाले आहेत. सोमवारी सायंकाळपासूनच तरुणांनी राजाराम कॉलेजच्या मैदानावर यायला सुरुवात केली होती. सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या या तरुणांनी हुडहुडी भरणार्या या थंडीतही सोमवारची रात्र मैदानावरच काढली. मंगळवारी पहिल्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील भरती प्रक्रिया होणार आहे.
या भरतीसाठी 98 हजार तरुणांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. राजाराम कॉलेज मैदानावरून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. शारीरिक चाचणी शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर होणार आहे. या भरतीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने भरती टप्प्याटप्प्याने करण्याचा निर्णय सैन्य दलाने घेतला असून ही भरती प्रक्रिया 11 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. तालुकानिहाय रोज पाच हजार उमेदवारांना भरतीसाठी बोलविण्यात आले आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगाव, गोवा आदी ठिकाणच्या तरुणांनी भरतीसाठी अर्ज केले आहेत.
भरतीसाठी येणार्या तरुणांसाठी व्हाईट आर्मी या संस्थेने मोफत अन्नछत्राची सोय केली आहे. या अन्नछत्राला सोमवारी रात्री नऊ वाजल्यापासून सुरुवात झाली. दररोज हे अन्नछत्र सुरू राहणार आहे.
भरतीला येणार्या तरुणांसाठी महापालिकेने पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था केली आहे. यापूर्वीच्या भरतीप्रक्रियेसाठी रस्त्यावरच गर्दी होत होती. पण यावेळी मैदानातच सर्व व्यवस्था केली आहे. त्यामुळे रस्त्यावर कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे.
अग्निवीर सैन्य भरती पहिल्यांदाच होत असल्याने या प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून प्रशासनाने कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. सायबर चौकापासूनच हा बंदोबस्त ठेवला आहे.