कोल्हापूर : गेल्या आठवडाभरापासून कोल्हापुरात कमालीचा उकाडा जाणवत आहे. गुरुवारी कमाल तपमानाने 37.1 अंशांपर्यंत उसळी घेतल्याने कोल्हापूरकर घामाघूम झाले होते. याशिवाय किमान तापमान देखील 22.6 अंशांपर्यंत वाढल्याने सायंकाळनंतर देखील उकाडा कायम असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान, हवामान विभागाने रविवारी (दि. 15) जिल्ह्याला विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तसेच सोमवारी (दि. 16) देखील पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
शहरात गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाचा चटका जाणवत होता. दुपारी उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला होता. परिणामी मुख्य रस्त्यांवरील वर्दळ दुपारनंतर काहीशी कमी झाली होती. उन्हापासून बचावासाठी नागरिक घरातून बाहेर पडताना टोपी, सनकोट, सनग्लास घालून फिरताना दिसत होते. तसेच शीतपेय, आईस्क्रीम पार्लरमध्ये देखील नागरिकांनी गर्दी केली होती.