मलकापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील मलकापूर शहरानजीक शाळी नदीवर असलेल्या पुलावर कंटेनरखाली सापडून टेकोली (ता. शाहूवाडी) येथील उल्हाशीबाई यशवंत कांबळे (वय 65) या महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात शाहूवाडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. अपघातानंतर चालक पसार झाला. हा अपघात शुक्रवारी दुपारी 3.30 वा.घडला.
शुक्रवारी मलकापूरचा आठवडी बाजार होता. यामुळे परिसरातील नागरिक, विक्रेते यांची गर्दी होती. त्यात शाळी नदीवरील पूल अरुंद आहे. दुपारी कोल्हापूरच्या दिशेने कंटेनर रत्नागिरीच्या दिशेने निघाला होता. याच दरम्यान रस्त्याच्या बाजूने पायी चालत असलेल्या उल्हाशीबाई कांबळे या कंटेनरच्या मागील चाकाखाली सापडल्या. 50 मीटर अंतरावर कंटेनरने फरफटत नेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच चालक कंटेनर सोडून पसार झाला.
दरम्यान, मलकापूरचा आठवडा बाजारादिवशी घटना घडल्याने शहरात वाहतूक कोंडी झाली होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगांच्या रांगा सुमारे तीन-चार किमी लागल्या होत्या. तब्बल पाच तासांनंतर कंटेनर बाजूला करण्यात आला.