कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची तारीख पुढे ढकलण्यात आल्याने राज्यभरातील एक लाखाहून अधिक शिक्षक सीईटीईटी परीक्षेला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा शिक्षकांची निवडणूक कामगिरी रद्द करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
केंद्रीय परीक्षा परिषदेकडून घेतली जाणारी सी-टीईटी ही परीक्षा 8 फेब्रुवारी रोजी एकाच वेळी देशभर घेण्यात येणार आहे. राज्य शासनाने गुरुवारी आदेश काढून महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका 5 फेब्रुवारीऐवजी 7 फेब्रुवारीला घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सी-टीईटी परीक्षेस बसलेल्या सुमारे एक लाख शिक्षकांना या परीक्षेला मुकावे लागणार आहे.
त्यामुळे त्यांचे भवितव्य अंधकारमय होण्याची शक्यता आहे. पदोन्नती व शिक्षक सेवेतील सातत्य राखण्यासाठी सुप्रीम कोर्टाने दोन वर्षांच्या आत टीईटी उतीर्ण होणे सक्तीचे केले असल्यामुळे या परीक्षेत बसणे शिक्षकांना आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने अचानक जि. प. व पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा बदलल्याने शिक्षकांत गोंधळाचे व भीतीचे वातावरण आहे.
जिल्हा परिषद निवडणूक या बदललेल्या तारखेनुसार निवडणुका पार पडणे व सी-टीईटी परीक्षेस बसलेल्या शिक्षकांना ही परीक्षा देता येणे या दोन्ही गोष्टी साध्य होण्यासाठी ज्या शिक्षकांना जिल्हा परिषद निवडणूक कामगिरी दिली आहे. त्यांची निवडणूक कामगिरी रद्द करणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य शासनाने केंद्राच्या सीटीईटी परीक्षेत बसलेल्य शिक्षकांची निवडणूक कामगिरी रद्द करावी व पर्यायी व्यवस्था करावी अशा प्रकारचे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकार्यांना द्यावेत, अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे.