[author title="विकास कांबळे" image="http://"][/author]
कोल्हापूर : जिल्हा परिषद यंत्रणेकडून साथीचे आजार टाळण्यासाठी गावागावांत करण्यात येणारे 'पाणी सर्वेक्षण कागदावर आणि साथीचे संकट गावांवर' अशी परिस्थिती अनेक गावांमध्ये दिसून येते. गेल्या वर्षभरात एकाही गावात दूषित पाणी आढळले नाही, तरीही वीस गावांमध्ये साथीचे आजार पसरले आहेत. यावरून जिल्ह्यात पाणी स्वच्छता सर्वेक्षणाबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून येते.
नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद कायमच आघाडीवर असते. जिल्हा परिषदेचा असा एकही विभाग नाही की, त्या विभागाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविलेला नाही. यातील अनेक उपक्रमांची दखल राज्याच्या ग्रामविकास विभागाने घेतली आहे. यातून नवीन योजना राज्यभर राबविलेल्या आहेत. यातील एक उपक्रम पाणी स्वच्छता सर्वेक्षणाचा आहे.
जिल्ह्यातील पाणी स्रोतांचे सर्वेक्षण करून त्यांची प्रतवारी ठरवून हिरवे, पिवळे आणि लाल कार्ड ग्रामपंचयातींना देण्याचा उपक्रम राबविला. जिल्हा परिषदेच्या वतीने 2009 पासून पिण्याचे पाणी स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तत्कालीन विस्तार अधिकारी व आरोग्य कर्मचारी संघटनेचे नेते एम. एम. पाटील यांचा हा उपक्रम सुरू करण्यात पुढाकार आहे. यामध्ये ग्रामपंचायत व जलसुरक्षकांची भूमिका महत्त्वाची असते.
सर्वेक्षणामध्ये स्रोताभोवतालचा परिसर, टाकीतून गावाला पाणीपुरवठा करण्यात येणार्या पाईप, पाणी साठवण टाकीची स्वच्छता, गटारीखालून पाईप घालण्यात आल्या आहेत काय, वापरण्यात येणारे टीसीएल आणि त्याचे प्रमाण, या बाबी तपासल्या जातात. हे तपासण्याची जबाबदारी ग्रामपंचायत आणि जलरक्षकांवर असली तरी सर्वेक्षण करताना आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामसेवक यांनीदेखील पाहणी करावयाची आहे. पाणी नमुने चांगले असतील त्या गावांना हिरवे कार्ड दिले जाते. ज्या गावांमध्ये पाणी अशुद्ध आहे; परंतु त्यामध्ये सुधारणा करण्यास वाव आहे, अशा गावांना पिवळे कार्ड दिले जाते आणि ज्या गावांचे पाणी दूषित आहे पिण्यास अयोग्य आहे, अशा गावांना लाल कार्ड दिले जाते.
जिल्ह्यात गेल्या वर्षभरात संपूर्ण गावांतील पिण्याचे पाणी स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले; परंतु एकाही गावाला किंवा ग्रामपंचायतीला लाल कार्ड मिळाले नाही. तरीही जिल्ह्यात साथीचे आजार वारंवार डोके वर काढत आहेत. कावीळ, अतिसारचा फटका जिल्ह्यातील पंधरा ते वीस गावांना बसला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे सर्वेक्षण केले जाते की नाही, याबद्दलच शंका उपस्थित करण्यात येत आहे.
लाल कार्ड एकाही गावाला नाही
सर्वेक्षणानंतर ग्रामपंचायतींना पाण्याच्या गुणवत्तेनुसार देण्यात येणार्या कार्डमध्ये 968 गावांना हिरवे कार्ड व 57 गावांना पिवळे कार्ड देण्यात आले आहे. लाल कार्ड एकाही गावाला दिले नसल्याची नोंद आहे. यावरून दूषित पाणी एकाही गावात नसल्याचे दिसून येते.
याला जबाबदार कोण?
जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे राज्यातील साथीचे आजार कमी होण्यास मदत झाली; परंतु कोल्हापूर जिल्ह्यात अधूनमधून साथी पसरत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. याला जाबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
पाणी गुणवत्ता निरीक्षक काय करतात?
पिण्याचे पाणी स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रमावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पाणी गुणवत्ता निरीक्षक पद निर्माण करण्यात आले आहे; परंतु गेल्या चार वर्षांत त्यांनी काय केले, हा संशोधनाचा विषय आहे.