कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : महापूराचे पाणी बालिंगा,शिंगणापूर,नागदेववाडी उपसा केंद्रात घुसल्यामुळे उद्या शनिवार दि.२७ पासून शहरातील पाणीपुरवठा बंदच राहणार आहे. थेट पाईपलाईन योजनेच्या वीजवाहिन्या जोडण्याचे काम पुर्ण झाले नसल्याने यातून पाणीपुरवठा होणार नाही.तर बालिंगा,शिंगणापूर,नागदेववाडी उपसा केंद्रात महापूराचे पाणी घुसल्यामुळे हा पाणीपुरवठाही बंद राहणार असल्याने शनिवारी शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.परिणामी भर पावसातही नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागणार आहे.
एका बाजूला शहरात महापूराच्या पाणयाने शिरकाव केला आहे.दारात पुराचे पाणी आहे. पण घरात खर्चासाठी पाणी नाही.अशी परिस्थिती शनिवारपासून होणार आहे. सुमारे २०० एमएलडीहून अधिक होणारा पाणीपुरवठा बंदच राहणार आहे.
थेट पाईपलाईन योजनेला वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिन्या तुटल्या आहेत. पोलवर झाडे पडले आहेत. सततच्या पावसाने आणि वादळ वाऱ्यामुळे या जोडण्या करण्यात अडचणी येत आहेत. अडथळे येत आहेत. शनिवारी रात्रीपर्यंत हे काम पुर्ण होईल असे सांगण्यात येते. मात्र त्याची गॅरंटी देता येत नाही. तर पर्याय म्हणून असणाऱ्या बालिंगा, शिंगणापर, नागदेववाडी योजनाही बंद करण्याची वेळ आली आहे. महापूराचे पाणी या उपसा केंद्रात गेल्यामुळे पाणीपुरवठा करता येणे शक्य नाही.