कोल्हापूर : पुईखडी ते चंबुखडी आणि पुढे कसबा बावड्याला जाणाऱ्या ६०० मी. मी. व्यासाच्या जलवाहिनीला बुधवारी (दि. ३) गळती लागली. त्यामुळे हजारो लिटर पिण्याचे पाणी जयंती नाल्यात मिसळत हाेते. त्यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महापालिका यंत्रणा हलली. पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी व्हॉल्वमध्ये अडकलेला कचरा काढून गळती काही प्रमाणात रोखली. गुरूवारी (दि. ४) पुन्हा संपूर्ण व्हॉल्व स्वच्छ करण्यात येणार असल्याचे जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी सांगितले.
थेट पाईपलाईनचे पाणी पुईखडीतून कसबा बावडा फिल्टर हाऊसला नेण्यासाठी ६०० मी. मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. त्यासाठी ठिकठिकाणी व्हॉल्व बसविण्यात आले आहेत. जयंती नाल्याजवळील पुलाखालील व्हॉल्वला गळती लागली. त्यामुळे पिण्याचे पाणी मोठ्या प्रमाणात जयंती नाल्यात मिसळत होते. प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी त्यासंदर्भात महापालिकेला कळविले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी व्हॉल्व स्वच्छ केला.