कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार बँटींग सुरू केली आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणे, तलाव यांच्या जलाशयांच्या पातळीमध्ये वाढ होत आहे. दरम्यान जिल्हा आणि शहरात गेले दोन दिवस पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी ३७ फूटांवर पोहोचली आहे. तर पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फुट इतकी आहे तर पंचगंगेची धोका पातळी ४३ फुट इतकी आहे. (Kolhapur Rain)
कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण ७४ बंधारे सध्या पाण्याखाली गेले आहेत. यामुळे अनेक ठिकाणी रस्ते हे वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. जिल्हा आपत्ती विभागाकडून नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपययोजना केल्या असून, नदी काठावरील गावे तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. (Kolhapur Rain)