नागाव : करवीर तालुक्यातील भुयेवाडी येथील शेतकरी लक्ष्मण शामराव पाटील यांच्या शेतात विंधन विहिरीतून (बोअरवेल) कोणत्याही इलेक्ट्रिक मोटरशिवाय आपोआप पाणी बाहेर येत असल्याने परिसरात मोठी औत्सुक्याची घटना ठरली आहे. निसर्गाचा हा आगळावेगळा चमत्कार पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
शेतकरी पाटील यांनी आपल्या शेतात पाण्याच्या शोधासाठी बोअरवेल मारण्याचा निर्णय घेतला. तब्बल 600 फूट खोल खोदाई केल्यानंतर अखेर पाण्याचा स्रोत लागला; मात्र आश्चर्य म्हणजे पाणी लागल्यानंतर मोटर टाकण्याची गरजच उरली नाही. बोअरवेलमधून सुमारे अडीच ते तीन इंच वेगाने पाण्याचा प्रवाह आपोआप जमिनीच्या वर येऊ लागला. सामान्यतः बोअरवेल मारताना हवेच्या दाबामुळे काही वेळ पाणी वर येते; मात्र भुयेवाडीतील या बोअरवेलमधून सलग दुसर्या दिवशीही पाण्याचा उपसा सुरूच आहे. कोणत्याही तांत्रिक उपकरणाशिवाय निसर्गदत्त दाबाने वाहणारे हे पाणी पाहून शेतकरीराजा सुखावला आहे.
भूगर्भ शास्त्रानुसार जेव्हा दोन अभेद्य खडकांच्या थरांमध्ये अडकलेल्या पाण्यावर प्रचंड नैसर्गिक दाब निर्माण होतो, तेव्हा त्याला ‘आर्टेशियन वेल’ (ईींशीळरप थशश्रश्र) म्हटले जाते. अशा स्थितीत विहीर खोदली असता पाणी पंपाशिवाय भूपृष्ठावर येते. या अनोख्या घटनेची बातमी वार्यासारखी पसरताच भुयेवाडीसह आसपासच्या गावांतील लोकांनी ही घटना पाहण्यासाठी शेतावर धाव घेतली आहे. कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर निसर्गाची ही किमया लक्ष्मण पाटील यांच्यासाठी आणि परिसरातील शेतीसाठी एक दिलासादायक देणगी ठरली आहे.