voting before wedding Shahuwadi
सुभाष पाटील
विशाळगड : एकीकडे सनई-चौघड्यांचे सूर, घरात सुरू असलेली नातेवाईकांची लगबग आणि काही तासांवर येऊन ठेपलेला लग्नाचा मुहूर्त... अशा वातावरणात कोणताही वर (नवरदेव) लग्नाच्या विधींमध्ये व्यस्त असतो. मात्र, शाहूवाडी तालुक्यातील परळे येथील वैभव विलास पाटील या तरुणाने आपल्या आयुष्यातील खास दिवशी 'नागरिक' म्हणून असलेल्या कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी वैभवने मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावत सर्वांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.
विधी सोडून गाठले मतदान केंद्र
शुक्रवार (दि. ७) हा वैभवच्या विवाहाचा दिवस. घरात लग्नाची धामधूम सुरू होती, पाहुण्यांची वर्दळ होती आणि विवाहापूर्वीचे धार्मिक विधी सुरू होते. मात्र, आजच लोकशाहीचा उत्सव म्हणजेच मतदानाचा दिवस असल्याने वैभवने प्रथम मतदान करण्याचा निर्णय घेतला. अंगाला हळद लागलेली असताना आणि डोक्याला लग्नाच्या मुंडावळ्या बांधलेल्या अवस्थेतच वैभवने थेट मतदान केंद्र गाठले.
मतदान केंद्रावर सर्वांचे वेधले लक्ष
नवरदेवाच्या पेहरावात जेव्हा वैभव मतदान केंद्रावर पोहोचला, तेव्हा तेथील कर्मचारी आणि इतर मतदारांनी त्याचे कौतुक केले. "लग्न हे वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचे कार्य आहेच, पण मतदान हे राष्ट्राच्या भविष्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे मी आधी मतदान करण्याचे ठरवले," अशा भावना वैभवने यावेळी व्यक्त केल्या.
परिसरात कौतुकाचा वर्षाव
आजच्या काळात सुशिक्षित तरुण मतदानाकडे पाठ फिरवत असताना, वैभव पाटील याने लग्नाच्या दिवशी दाखवलेली ही सतर्कता शाहूवाडी तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे. त्याच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, "लोकशाही प्रति निष्ठा असावी तर अशी," अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटत आहे.