राशिवडे : पुढारी वृतसेवा : निवडणुकीच्या तोंडावर भोगावती साखर कारखान्याची बदनामी करुन द्वेषाचे राजकारण सुरु आहे. भोगावतीमधील साखर विक्री रितसर आणि नियमानुसार होत आहे. परंतु, काही लोक कारखान्याची बदनामी करत आहेत, त्याच्यांवर कायदेशीर सल्ला घेऊन कारखान्याच्यावतीने अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर, कार्यकारी संचालक संजय पाटील व संचालक मंडळाने पत्रकार परिषदेमध्ये दिली.
उदयसिंह पाटील यावेळी म्हणाले की, जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेमध्ये भोगावतीबाबत प्रश्न विचारण्याची गरज नव्हती. केवळ कारखान्याचे अध्यक्ष असलेले पी. एन. पाटील हे बँकेचे संचालक असल्याने मानहानीचे हे षडयंत्र होते. भोगावतीमध्ये साखरेची विक्री नियमानुसारच केली जात आहे.
भोगावतीची साखर परस्पर विकली जात असल्याचा आरोप स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांनी केला होता, याबाबत ते म्हणाले की, आम्ही साखरविक्रीचा भरणा पारदर्शकपणे केला आहे. निदान याची माहिती घेण्याची तसदी घेतली असती तर बरे झाले असते. केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवुन चुकीची आणि कारखान्याच्या बदनामीचे प्रयत्न करु नयेत. निवडणुकीच्या मैदानात आरोप करा, त्याची आम्ही उत्तरे देऊ. हुकुमशाही पध्दतीने कारखान्यात घुसून खोटी माहिती घेणे शोभत नाही. वारंवार होणाऱ्या चुकीच्या आणि बदनामीकारक आरोपामुळे भोगावतीच्या सर्व कारभारावर व्यापक परिणाम होऊ शकतो याचे तरी निदान भान ठेवा. असेही ते यावेळी म्हणाले.
तसेच कारभाराबद्दल काही शंका असल्यास आम्हाला भेटून निदान चर्चा करा, तुम्हाला समाधानकारक उत्तरे देऊ. मात्र, आता पाणी डोक्यावरून गेले आहे, कोणत्याही परिस्थितीत अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असे त्यांनी सांगितले. यावेळी संचालक हिंदुराव चौगले, धीरज डोंगळे, ए. डी. पाटील, मारुतराव जाधव, संजयसिंह पाटील, ए. डी. चौगले, रवी पाटील आदी उपस्थित होते.
भाकरीची जाणीव तरी ठेवा
कारखान्यातीलच काही कर्मचारी चुकीची आणि भोगावतीच्याबाबतीत बदनामीकारक माहिती बाहेर पुरवित आहेत. त्याची शहानिशा होईलच, कारखाना वाचला तरच भाकरी टिकणार आहे, पण त्या कर्मचाऱ्यांनी भाकरीचीही जाणीव ठेवावी असा इशारा संचालक प्रा. सुनिल खराडे यांनी दिला.
हेही वाचा :