सातारा, पुढारी वृत्तसेवा : 'पुढारी'चे संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक वाघनखांबाबत सत्य समोर आणले आहे. याला अनेकांचे समर्थनही आहे. त्यांनी याबाबतचे पुरावेही सादर केले आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत खा. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
शुक्रवारी सातारा येथील पत्रकार परिषदमध्ये खा. उदयनराजे भोसले बोलत होते. यावेळी लंडन येथील संग्रहालयात असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे 16 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. ही वाघनखे स्वत: छत्रपती शिवरायांनी वापरली आहेत की नाही, याबाबत राज्यात मतमतांतरे व्यक्त केली जात आहेत. याबाबत विचारले असता, खा. उदयनराजे भोसले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांची जेव्हा चोरी झाली, तेव्हा माझा जन्मच झाला नव्हता. त्यामुळे याबाबत मला जास्त माहिती नाही. मात्र, 'पुढारी'चे संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक वाघनखांबाबत सत्य समोर आणले आहे. याला अनेकांचे समर्थनही आहे. त्यांनी याबाबतचे पुरावेही सादर केले आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.
टोल नाक्यांबाबत राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका रास्त आहे. जिल्ह्यातील दोन्ही टोल नाके बंद केले पाहिजेत. आरक्षणाबाबत ठोस निर्णय न घेणार्या त्या त्या सरकारची चूक आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या शनिवारी होेणार्या सभेस जाणार नाही; पण नंतर भेट घेणार असल्याचे उदयनराजेंनी स्पष्ट केले.