आशिष शिंदे
कोल्हापूर : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या जकातीमुळे राज्यातील तसेच देशातील मत्स्य व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. एप्रिल 2025 मध्ये भारतातून होणार्या मासे व कोळंबी निर्यातीवरील शुल्क 16.5 टक्क्यांवरून थेट 60 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. महाराष्ट्रासह भारतातील सुमारे 2 कोटी लोकांचा रोजगार या उद्योगावर अवलंबून आहे. यात सर्वाधिक फटका कोळंबी निर्यातीला बसणार आहे. कारण, अमेरिकेला जाणार्या भारतीय सी-फूडमध्ये कोळंबीचा वाटा 90 टक्के पेक्षा जास्त आहे.
भारताने अमेरिकेला 2024 मध्ये 2.8 अब्ज डॉलर्स (सुमारे 23,000 कोटी) किमतीची कोळंबी निर्यात केली होती. मात्र 2025 मध्ये आतापर्यंत हे प्रमाण फक्त 500 दशलक्ष डॉलर्सपर्यंत मर्यादित राहिले आहे. याचा परिणाम थेट मासे उत्पादक, प्रक्रिया केंद्रे, तसेच किनारपट्टीवरील गावांवर होणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा सी-फूड बाजार आहे. तिथे जाणार्या कोळंबीच्या निर्यातीवर आता 60 टक्के शुल्क लागल्याने भारतीय निर्यातदारांचे दर इतर प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत झपाट्याने वाढतील. इक्वाडोरला केवळ 10 टक्के शुल्क, इंडोनेशियाला 19 टक्के आणि व्हिएतनामला 20 टक्के शुल्क लागणार असल्याने भारत स्पर्धेत मागे पडेल. सुमारे 15 टक्के वार्षिक विक्री ही साठा (इन्क्वेंटरी) म्हणून ठेवलेली असते, त्यामुळे विद्यमान साठ्यावर थेट तोटा होणार आहे. अमेरिकेच्या आयातीतील हा धक्का भरून काढण्यासाठी चीन, जपान, व्हिएतनाम, थायलंड, कॅनडा यांसारख्या बाजारपेठेत अधिक आक्रमक पावले उचलावी लागतील, असे तज्ज्ञ सांगतात.