पुण्या- मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  Pudhari News Network
कोल्हापूर

मोठी बातमी: कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी उद्यापासून टोलमाफी

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाही गणपती सणासाठी पुण्या- मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक आज (दि. ४) जारी केले आहे. याबाबतच्या सुचना टोल नाका प्रशासनास देण्यात आलेल्या आहेत. ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत मुंबई- बंगळुरू आणि मुंबई - गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या गणेश भक्तांच्या वाहनांना टोल माफी मिळणार आहे. (Ganeshotsav 2024)

महामार्गावरील यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना 

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची अडचण लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणार्‍या भक्तांना गणेशोत्सव काळात गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही टोलमाफी देण्याची घोषणा केली होती . कोकणात पुणे व कोल्हापूरमार्गे जाणार्‍या गणेशभक्तांना टोल माफी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सवलत एसटी बसेसना ही लागू होणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तसेच कोल्हापूरमार्गे कोकणात जाणार्‍या वाहनांची वाहतूक कोंडी टाळण्याच्या दृष्टीने महामार्गावरील यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. (Ganeshotsav 2024)

वाहनांवर लावण्यासाठी स्टिकर घ्यावे लागणार

कोकणात जाणार्‍या वाहनांना ‘गणेशोत्सव-कोकण दर्शन’ या नावाचे स्टीकर पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. टोल सवलतीचा हा कालावधी ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२४ असा सुमारे पंधरा दिवसांचा असेल. यासाठी स्थानिक पोलीस ठाणे व प्रादेशिक परिवहन विभागाकडे वाहनांची नोंदणी करून त्यांच्याकडून वाहनांवर लावण्यासाठी स्टिकर घ्यावे लागणार आहेत. पुण्याहून निघाल्यानंतर चिपळूणकडे जाणारी वाहने कराड पासून पाटण मार्गे रत्नागिरी, राजापूरला जाणारी वाहने किणी -वाठार वारणानगर- कोडोली मार्गे आंबा घाटातून जातील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT