जयसिंगपूर : कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जयसिंगपूर येथील पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी विशाल खाडे, अमोल अवघडे व विजय पाटील या तिघांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबतची कारवाई पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केली. दरम्यान, अवैध व्यावसायिकांशी लागेबांधे असल्याच्या तक्रारीवरून निलंबनाची कारवाई झाल्याचे समजते. या कारवाईमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.
निलंबित कार्यकाळात तीन पोलिस कर्मचार्यांनी कोल्हापूर मुख्यालय येथे राखीव पोलिस निरीक्षक याठिकाणी हजेरी देण्यात यावी, तसेच पोलिस उपअधीक्षक कोल्हापूर यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडण्याचे नाही, असेही आदेशात म्हटले आहे. दरम्यान, या कर्मचार्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील राजकीय नेत्यांबरोबरच व्यापारी, व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी आठ महिन्यापूर्वी केली होती. यातूनच ही कारवाई झाल्याचे समजते. गुरुवारी ही कारवाई झाल्याचे समजल्यानंतर शिरोळ तालुक्यातील पोलिस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.