कोल्हापूर : शहरात सकाळपासूनच्या रिपरिपीनंतर दुपारी पावसाने अचानक दमदार एंट्री मारली. सुमारे तीन तासांच्या धुवाँधार पावसामुळे सखल भागांना अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले होते. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील कुंभी, पाटगाव, घटप्रभा, जांबरे, कोदे या धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. राधानगरीच्या ३ व ६ क्रमांकाच्या दरवाजातून ४२५६ क्युसेक विसर्ग सुरूच आहे. दूधगंगा धरणाच्या विद्युत निर्मिती केंद्रातून शुक्रवारी (दि. ७) सकाळी ८ वाजता ९०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. पावसाचा जोर कमी-जास्त होत असल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत चढउतार कायम आहे. गुरुवारी रात्री ११ वाजता पंचगंगेची पातळी ३० फूट ९ इंचांवर होती.
गेल्या आठवडाभरापासून शहरात पावसाची हलकी रिपरिप सुरू आहे. गुरुवारी सकाळपासून पावसाची उघडझाप सुरूच होती. मात्र, दुपारी पावणेदोनच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर शहरात सुमारे तीन तास जोरदार पाऊस झाला. या जोरदार पावसामुळे शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते; तर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत गगनबावडा तालुक्यात ४६ मि.मी., भुदरगड तालुक्यात १५.१ मि.मी., राधानगरी १२.२, आजरा १२ तर पन्हाळा तालुक्यात १० मि.मी. पाऊस झाला. इतर तालुक्यांत तुरळक पाऊस झाला.