कोल्हापूर : सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात गुरुवारी हजारो शिक्षकांनी एल्गार पुकारत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.  (छाया : नाज ट्रेनर)
कोल्हापूर

Teachers Protest | अशैक्षणिक धोरणाविरोधात हजारो शिक्षक रस्त्यावर

शासनाचा निषेध; ‘विद्यार्थ्यांना शिकू द्या, शिक्षकांना शिकवू द्या’ची मागणी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : सेवाज्येष्ठता डावलून देण्यात आलेल्या पदोन्नती, अन्यायी संचमान्यता निर्णय, २० पटाखालील शाळा बंद करण्याचा डाव, ‘टीईटी’ची शिक्षकांना सक्ती, अशैक्षणिक कामांचा ताण यासह सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात हजारो शिक्षकांनी एल्गार पुकारला. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा काढून शासनाचा निषेध केला. ‘विद्यार्थ्यांना शिकू द्या, शिक्षकांना शिकवू द्या’ अशी मागणी केली. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले.

कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि विविध शिक्षक संघटना यांनी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. शिक्षकांना सन्मान - राष्ट्राचा अभिमान, शिक्षण सेवक योजना बंद करा, आमचा निर्धार - गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा निर्धार’ अशा आशयाचे फलक हातात घेऊन घोषणाबाजी करीत हजारो शिक्षक रस्त्यावर उतरले होते. व्हिनस कॉर्नर, बसंत-बहार मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सांगता झाली.

जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांनी सभा घेतली. शैक्षणिक व्यासपीठचे अध्यक्ष एस. डी. लाड म्हणाले, सरकारी शाळा बंद पाडून खासगी शाळांमध्ये विलीनीकरणाचा डाव आखला जात आहे. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या मान्य झाल्या नाहीत तर लढा तीव्र केला जाईल. मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पोवार म्हणाले, उत्तर प्रदेश, झारखंड, केरळ, कर्नाटक राज्यात शिक्षकांसाठी टीईटीची वेगळी परीक्षा घेतली जाते. त्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार का घेऊ शकत नाही? श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे म्हणाले, गोरगरिबांच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेतला जात आहे. शिक्षकांची टीईटी रद्द होणार नसेल तर सर्वच अधिकाऱ्यांची एमपीएससी, यूपीएससीची पुनर्परीक्षा घ्यावी. यात जे नापास होतील त्यांची पदे गेली तर चालेल का, मग शिक्षकांना का नियम लावले जातात?

राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे म्हणाले, शिक्षकांच्या मागण्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. प्रलंबित मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे, हे दुर्दैवी आहे. दादासाहेब लाड, प्रमोद तौंदकर, आर. वाय. पाटील, राजाराम वरुटे, श्रीराम साळुंखे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी बाबा पाटील, सुधाकर सावंत, बी. जी. बोराडे, गौतम वर्धन, राजेंद्र कोरे, संतोष आयरे, वृषाली कुलकर्णी, विलास पिंगळे, संदीप मगदूम, दिलीप माने उपस्थित होते.

शाळा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

चुकीच्या शासनाच्या धोरणाविरोधात शिक्षकांनी शाळा बंद ठेवून भव्य मोर्चा काढला. यात ३ हजारांहून प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील २० हजार शिक्षक, शिक्षकेतर सेवक सहभागी झाले होते. यामुळे विद्यार्थांना अघोषित सुट्‌टी मिळाली. शाळा परिसरात शुकशुकाट होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT