कोल्हापूर : कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या अखत्यारितील पाच जिल्ह्यांत शिक्षकांपासून ते उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्यासह विविध शेकडो पदे अद्यापही रिक्तच आहेत. राज्य सरकारची भरती प्रक्रिया राबविण्याबाबत अनास्था असल्याने याचा शाळांच्या गुणवत्तेसह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे.
कोल्हापूर विभागांतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हे येतात. 2012 पासून शिक्षक भरती बंद आहे. त्यातच शेकडो शिक्षक निवृत्त झाले आहेत; पण शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्याबाबत राज्य सरकारकडून पावले उचलली गेली नाहीत. नवीन सरकारकडून शिक्षक भरतीची अपेक्षा पात्र उमेदवारांकडून केली जात आहे.
कोल्हापूर विभागात शिक्षण उपनिरीक्षक, वेतन पथक अधीक्षक, लेखाधिकारी, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, उपशिक्षणाधिकारी योजना, गटशिक्षणाधिकारी, डाएट अधिव्याख्याता यासह 31 प्रकारची विविध 254 पदे आहेत. त्यामधील 112 सध्या कार्यरत असून, 142 पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक गटशिक्षणाधिकारी (41), उपशिक्षणाधिकारी माध्यमिक (12), शालेय पोषण आहार अधीक्षक (41), डाएट अधिव्याख्याता (8) पदे रिक्त आहेत.शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत 2003 च्या आकृतिबंध व सुधारित लघुलेखक, ग्रंथपाल, समुपदेशक, शिल्पशिक्षक, वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षक, लिपिक, सहायक अधीक्षक, वाहनचालक, तालुका समादेशक, सांख्यिकी सहायक अशी सुमारे 413 पदे मंजूर आहेत. यात सरळसेवा भरती (290) व पदोन्नतीच्या (123) पदांचा समावेश आहे. सध्या सरळसेवेतील 51, पदोन्नतीने 88 अशी 139 पदे कार्यरत आहेत; तर सरळसेवा 239, पदोन्नतीने भरली जाणारी 35 अशी मिळून एकूण 274 पदे रिक्त आहेत.
वर्ग-1 व 2 ची पदे लवकरच भरण्यात येणार असून, त्यांचे सध्या प्रशिक्षण सुरू आहे. वर्ग-क संदर्भातील अनुशेष बिंदुनामावली तपासून घेऊन शिक्षण आयुक्त कार्यालयास सादर केली आहे. लिपिकवर्गीय पदांचे प्रात्यक्षिक पूर्ण झाले असून, ते लवकरच हजर होतील.महेश चोथे, शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग