कोल्हापूर : सह्याद्री व्याघ राखीव क्षेत्रात वाघांची संख्या वाढवण्यासाठी हाती घेण्यात आलेला वाघ पुनर्स्थापना (टायगर रिकव्हरी प्रोजेक्ट) प्रकल्प यशाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ प्रकल्पातून स्थलांतरित केलेल्या चंदा (एसटीआर - टी -4) आणि तारा (एसटीआर - टी - 5) या दोन वाघिणींनीच्या गळ्यातील जीपीएस रेडिओ कॉलर काढण्यात आले आहे. सह्याद्रीचा अधिवास पूर्णपणे स्वीकारून चंदा आणि ताराने आपली स्वतःची टेरटरी निश्चित केल्यानतंर वन विभाग आणि भारतीय वन्यजीव संस्थेने त्यांच्या गळ्यातील हे रेडिओ कॉलर काढले आहेत.
चंदा या वाघिणीला 20 नोव्हेंबर 2025 रोजी, तर ताराला 18 डिसेंबर 2025 रोजी रेडिओ कॉलर लावून सह्याद्रीच्या जंगलात मुक्त करण्यात आले होते. गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून रेडिओ कॉलर आणि कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून त्यांच्यावर 24 तास बारीक लक्ष ठेवण्यात आले होते. या निरीक्षणादरम्यान दोन्ही वाघिणींनी चांदोली वन्यजीव विभागात स्वतःची हद्द निश्चित केली असून, त्यांनी तेथील मूळ रहिवासी असलेल्या सेनापती (एसटीआर - टी - 1), सुभेदार (एसटीआर - टी - 2) आणि शिलेदार (एसटीआर - टी - 9) या नर वाघांसोबत संचार केल्याचेही कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसून आले आहे. हा सकारात्मक बदल पाहता, 9 एप्रिल 2026 रोजी तारा (एसटीआर - टी - 5) आणि 10 एप्रिल रोजी चंदा (एसटीआर - टी - 4) या वाघिणींची ट्रॅकिंग कॉलर काढण्यात आली.
ड्रॉप-ऑफ तंत्रज्ञानाचा वापर करून काढला कॉलर
वन्यजीवांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जाणारा ट्रॅकिंग कॉलर (रेडिओ कॉलर) हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे, जे प्राण्यांच्या गळ्याभोवती पट्ट्यासारखे बसवले जाते. यामध्ये बसवलेले जीपीएस आणि ट्रान्समीटर प्राण्याचे अचूक लोकेशन सॅटेलाईटद्वारे वन विभागाला कळवतात. हा कॉलर काढण्यासाठी ‘ड्रॉप-ऑफ’ तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, ज्यामध्ये एका ठरावीक कालावधीनंतर किंवा संगणकीय कमांडद्वारे कॉलरचा लॉक आपोआप सुटतो आणि तो जमिनीवर पडतो.