राशिवडे; प्रवीण ढोणे : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या भोगावती (परिते), दुधगंगा (बिद्री), मंडलिक (हमीदवाडा), आजरा, इंदिरा (ताबाळे), सह्याद्री (धामोड), गायकवाड (सोनवडे) या सात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुक प्रक्रियेस दि.१ मार्चनंतर सुरुवात होणार आहे. तर जुन अखेर मतदान होणार आहे. १२० दिवसाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये दोन टप्प्यात मतदार होणार असले तरी सातही कारखान्याची मतदान प्रक्रिया जून अखेर संपन्न होणार आहे.
जिल्ह्यातील सात साखर कारखान्याच्या संचालकमंडळीची मुदत संपुन बराच कालावधी उलटला आहे. निवडणुक तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सातही कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांची साखर सहसंचालक श्री.गाडे यांनी बैठक घेऊन आढावा घेतला. संबंधित कारखान्यांनी निवडणुक प्रक्रियेसाठी निधी भरावा अशा सुचना दिल्या. तर निवडणुक प्रक्रिया दि.१ मार्चपासुन सुरु करणार असल्याचे सुचित केले. भोगावती, बिद्री, हमिदवाडा या कारखान्याची निवडणुक अग्रक्रमाने होईल तर उर्वरित कारखान्याची निवडणुक प्रक्रिया त्यानंतर सुरु होईल. या सातही कारखान्याचे मतदान जून अखेर होईल या पध्दतीने यंत्रणा राबविली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऐन उन्हाच्या कडाक्यात राजकीय वातावरण तापणार आहे.
साखर कारखान्याच्या निवडणुकींना विधानसभा, लोकसभेची किनार?
भोगावतीची सत्ता काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील यांच्याकडे तर बिद्रीची सत्ता राष्ट्रवादीचे के.पी.पाटील यांच्याकडे तर हमिदवाडा कारखान्याची सत्ता शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्याकडे आहे. आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांना महत्व येणार आहे.
जिल्ह्यातील सातही कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. यामध्ये निवडणुक खर्चासाठी निधी भरण्याच्या सुचना दिल्या असुन दि.१ मार्चनंतर प्रक्रिया सुरु होऊन जुन अखेर मतदान संपेल.
– श्री. ए.व्ही. गाडे, साखर सहसंचालक