कोल्हापूर : गेल्या दहा दिवसांपासून कोल्हापुरात कमालीचा उकाडा जाणवत आहे. पारा 37 अंशांपुढे गेल्याने कोल्हापूरकर अक्षरशः घामाघूम झाले आहेत. ढगाळ वातावरण व जिल्ह्यात शनिवारी झालेल्या पावसामुळे रविवारी कमाल तापमानात घसरण होऊन पारा 35.4 अंशांवर स्थिरावला होता. यामुळे उन्हाचा चटका काहीसा कमी झाल मात्र ढगाळ वातावरणामुळे उष्मा अधिक जाणवत होता. दरम्यान, हवामान विभागाने सोमवार (दि. 16) व मंगळवारी जिल्ह्याला वादळी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
शहरात रविवारी दुपारपर्यंत उन्हाचा तडाखा जाणवत होता. दुपारनंतर काही काळ ढगाळ वातावरण झाले होते. पुन्हा पावसाच्या हलक्या सरी कोसळतील अशी शक्यता वाटत होती. मात्र, पावसाने हुलकावणी दिली. ढगाळ वातावरणामुळे वाढलेली सापेक्ष आर्द्रता आणि 22.6 अंशांवर गेलेले किमान तापमान यामुळे सायंकाळनंतर देखील उकाडा जाणवत होता. जिल्ह्यात गुरुवार (दि.19) पर्यंत ढगाळ वातावरण व पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.