राहुल गांधी यांचा दौरा रद्द झाल्याने कार्यक्रमात बदल. file photo
कोल्हापूर

कसबा बावडा येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे आज अनावरण

राहुल गांधी यांचा दौरा रद्द झाल्याने कार्यक्रमात बदल

पुढारी वृत्तसेवा

कसबा बावडा : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शुक्रवारचा त्यांचा दौरा रद्द झाला. शनिवारी (दि. 5) सकाळी ते कोल्हापुरात येणार आहेत. त्यामुळे कसबा बावडा येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते शनिवारी सकाळी दहा वाजता करण्यात येणार आहे. या शानदार सोहळ्याचे नेटके संयोजन करण्यात आले आहे. आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून हा बहुशस्त्रधारी भव्य पुतळा साकारला आहे.

राहुल गांधी शुक्रवारपासून दोन दिवस कोल्हापूर दौर्‍यावर येणार होते. त्यामुळे त्यांच्या दौर्‍याची जिल्हा काँग्रेसच्या वतीने जय्यत तयारी केली होती. राज्य पातळीवरील नेते देखील कोल्हापुरात सकाळपासून दाखल होत होते. यामध्ये महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, खासदार चंद्रकांत हंडोरे, आ. बाळासाहेब थोरात, आ. भाई जगताप, आ. विश्वजित कदम, आ. नसीम खान, माणिकराव ठाकरे आदींचा समावेश होता. चार वाजता राहुल गांधी विमानाने कोल्हापुरात येणार होते. म्हणून त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील, खा. शाहू महाराज यांच्यासह सर्व नेते विमानतळावर गेले होते. परंतु सव्वापाचच्या सुमारास त्यांना विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दौरा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

कसबा बावडा येथे कार्यक्रमासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या ठिकाणचा उत्साह ओसंडून वाहत होता. शाहीर आपल्या शाहिरीतून उपस्थितांमध्ये पोवाड्याद्वारे चैतन्य निर्माण करत होते. विद्युत रोषणाईने परिसर झळकू लागला होता. इतक्यात राहुल गांधी यांचा दौरा रद्द झाल्याची चर्चा सुरू झाली. निवेदकाने पुतळा समितीच्या सर्व सदस्यांना बोलावून घेतले. व्यासपीठासमोर गर्दी झाली. त्यांच्यामध्ये चर्चा सुरू होती तोपर्यंत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील व्यासपीठावर आले. विमानामधील तांत्रिक बिघाडामुळे राहुल गांधी यांचा दौरा रद्द झाल्याचे आ. सतेज पाटील यांनी सांगताच शांतता पसरली. राहुल गांधी शनिवारी सकाळी कोल्हापुरात दाखल होणार आहेत. त्यांच्याच हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण शनिवारी सकाळी 10 वाजता करण्यात येणार असल्याचे आ. पाटील यांनी जाहीर केले. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला तसेच राज्य पातळीवरील नेते उपस्थित होते.

दरम्यान, राहुल गांधी यांचे सकाळी दहा वाजता विमानाने कोल्हापुरात आगमन होईल. तेथून ते कसबा बावड्याकडे रवाना होतील. भगवा चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होईल. त्यानतंर शाहू समाधी स्थळास भेट देऊन ते अभिवादन करतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT