हातकणंगले, पुढारी वृत्तसेवा : भरधाव एस.टी. बसने प्रवासी रिक्षाला जोराची धडक दिल्याने रिक्षातील तिघेजण ठार झाले. शिवानी घेवरचंद खत्री (32, रा. साखरपे दवाखान्याजवळ, इचलकरंजी), श्रीतेज विलासराव जंगम (10) व ललिता हंसराज खत्री (31) अशी मृतांची नावे आहेत; तर रिक्षाचालक प्रशांत पेटकर (रा. बंडगर माळ इचलकरंजी) व कियान घेवरचंद खत्री (5) हे दोघेजण जखमी आहेत. हा अपघात सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील रामलिंग फाट्यावर सोमवारी सायंकाळी 6 वाजता झाला. अपघाताची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबतची माहिती अशी, रिक्षाचालक प्रशांत पेटकर रिक्षाने (एमएच 09 जे 8989) इचलकरंजी येथील दोन लहान मुलांसह चार प्रवासी घेऊन श्रावण सोमवार असल्याने रामलिंगला निघाले होते. रामलिंग फाट्यावरून रामलिंग-धुळोबा देवालयाकडे वळण घेत होते. त्यावेळी कोल्हापूरहून सांगलीकडे एस. टी. (एमएच 14 बीटी 2509) भरधाव निघाली होती. बसचालक रवींद्र प्रभाकर चव्हाण (रा. पंढरपूर) याच्या समोर वळण घेत असलेली रिक्षा लक्षात न आल्याने भरधाव बसने रिक्षाला जोराची धडक दिली. चार ते पाच पलटी खाऊन रिक्षा 60 ते 70फूट फरफटत गेली.
यामध्ये शिवानी खत्री आणि श्रीतेज जंगम हे जागीच ठार झाले तर ललिता खत्री यांचे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना निधन झाले. हातकणंगले पोलिसांनी रिक्षाचालक प्रशांत पेटकर याला उपचारासाठी तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. एस. टी. चालक रविींद्र प्रभाकर चव्हाण याला हातकणंगले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. मुख्य रस्त्यावरच अपघात झाल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता.