कोल्हापूर : कर्मचारी निवड आयोगाने (एसएससी) परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता व उमेदवारांचा विश्वास वाढवण्यासाठी महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. या वर्षापासून चुकीच्या किंवा अस्पष्ट प्रश्नांसाठी बोनस गुण, आऊट ऑफ सिलॅबस प्रश्नांसाठी समान गुण, भाषा आणि अनुवादातील चुकीसाठी नवीन फॉर्म्युला असे काही नवीन बदल केले आहेत. याचा लाखो परीक्षार्थी उमेदवारांना फायदा होणार आहे.
‘एसएससी’कडे मागील वर्षी तांत्रिक त्रुटी, प्रश्नांचा दर्जा आणि नॉर्मलायझेशन प्रक्रियेबाबत सुमारे 55 हजार तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याशिवाय, अनेक प्रकरणे न्यायालयातही प्रलंबित होती. या पार्श्वभूमीवर आयोगाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नवीन नियमानुसार, चुकीचे किंवा अस्पष्ट प्रश्न आढळल्यास ते रद्द करण्यात येतील आणि त्या प्रश्नांचे पूर्ण गुण सर्व उमेदवारांना दिले जातील. यापूर्वी असे प्रश्न काढून टाकले जात आणि केवळ तो प्रश्न सोडवणाऱ्या उमेदवारांनाच गुण मिळत होते. तसेच, अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न असल्यासही सर्वांना समान गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भाषा व अनुवादातील चुका टाळण्यासाठीही नवीन फार्म्युला लागू केला आहे. एखादा प्रश्न प्रादेशिक भाषेत चुकीचा आणि इंग््राजीत बरोबर असल्यास तो प्रश्न त्या भाषेच्या उमेदवारांसाठी रद्द केला जाईल. प्रत्येक भाषेतील प्रश्नांचे मूल्यमापन स्वतंत्रपणे केले जाईल. यामुळे पूर्वी निर्माण होणारे वाद आणि गोंधळ टाळण्यास मदत होणार आहे. या नव्या नियमांमुळे परीक्षा प्रक्रिया अधिक न्याय्य, पारदर्शक आणि विद्यार्थीकेंद्री होतील, अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
चुकीचा पर्याय निवडल्यास निगेटिव्ह मार्किंग
एका प्रश्नाचे एकापेक्षा अधिक बरोबर पर्याय असल्यास योग्य पर्याय निवडणाऱ्यांनाच गुण मिळतील, तर चुकीचा पर्याय निवडल्यास निगेटिव्ह मार्किंग लागू राहील. यापूर्वी काही वेळा चुकीचा पर्याय निवडणाऱ्यांनाही गुण दिले जात होते; मात्र आता ही तरतूद बंद करण्यात आली आहे.