कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदा फेब—ुवारी-मार्चमध्ये झालेल्या मुख्य परीक्षेच्या धर्तीवर पुरवणी परीक्षेचे नियोजन 15 दिवस आधी केले आहे. त्यानुसार 16 जूनपासून परीक्षांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.
पुरवणी परीक्षेसाठीची अर्ज प्रक्रिया सध्या शिक्षण मंडळाकडून सुरू आहे. बारावीची लेखी परीक्षा 16 जून ते 8 जुलै या कालावधीत होईल. याच कालावधीत विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा होतील. दहावीची परीक्षा 16 ते 30 जून दरम्यान होणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षा पार पडतील. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक विद्यार्थ्यांना www. mahahsscboard. in संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी लवकरच पुरवणी परीक्षा घेण्यात येत आहेत. जुलैमध्ये परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला उशीर झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. तेव्हा प्रवेश प्रक्रिया 9 महिने सुरू होती. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. गेल्या वर्षीप्रमाणे उशीर होऊ नये म्हणून यंदा राज्य मंडळाने परीक्षा व निकाल लवकर घेण्याचे नियोजन केले आहे.